केंद्र सरकारने अडकलेल्या परप्रांतीय नागरिकांना त्यांच्या राज्यात जाण्याची मुभा देण्याची सूचना केली आणि महाराष्ट्रातले थोडे थोडके नव्हे तर 1800 विद्यार्थी कोटा इथे अडकले होते, त्यांचा जीव भांड्यात पडला.
केंद्राने घालून दिलेल्या सगळ्या नियमांची पूर्तता करू या विद्यार्थ्यांनी गुरुवारी महाराष्ट्राकडे कूच केलं. बरोबर महाराष्ट्र दिनाला ते राज्यात पोहोचतील.
महाराष्ट्र शासनाने खास प्रयत्न करून या विद्यार्थ्यांना मायभूमीकडे आणण्यासाठी विशेष व्यवस्था केली.
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आम्हाला आमच्या गावी जायला मिळणं यासारखी मोठी भेट नाही, अशीच भावना या वेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आणि राज्य शासनाचे आभार मानले.
या मुलांना घेऊन येण्यासाठी राज्यातर्फे 73 एसटी बसेस राजस्थानात धाडण्यात आल्या होत्या.
व्यवस्थित नोंदणी करून, त्यांची तपासणी करून या 1800 विद्यार्थ्यांना राजस्थानातून सोडण्यात आलं, तेव्हा त्यांनी बसमध्येच जय महाराष्ट्रचा जयघोष केला.
आम्हाला आमच्या राज्यात जाऊ द्या, अशी या विद्यार्थ्यांनी अनेक दिवसांपासूनची मागणी होती. स्पर्धा परीक्षा अभ्यासाचं केंद्र झालेल्या कोटा इथे हे विद्यार्थी होते.