प्रतिनिधी आसिफ मुरसल, सांगली : आंबा म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं. यंदा आंब्याच्या पेटीसाठी मात्र खिसा जरा जास्तच खाली करावा लागू शकतो. कोकणचा राजा हापूस आंब्याने महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात जरा जास्तच भाव खाल्ला आहे.
सांगलीमध्ये आंब्याच्या पेटीला उच्चांकी दर मिळाला आहे. त्यामुळे आंबा उत्पादकांना एका अर्थी यंदा अच्छे दिन येत असल्याचं म्हणायला हरकत नाही. तर दुसरीकडे आंबाप्रेमींचा खिसा मात्र जास्तच रिकामा होणार आहे.
बदलत हवामान आणि त्यामुळे फळबागांवर होणारा परिणाम पाहता यावर्षी आंब्याचं उत्पादन तसं कमीच आलं आहे. त्यामुळे आंब्याचे दर यंदा बाजारपेठेत चढे आहेत.
कोकणचा राजा म्हणून ओळख असणाऱ्या हापूस आंब्याच्या चार पेट्या सांगलीच्या बाजारामध्ये दाखल झाल्या असून पहिल्या पेटीला 4100 इतका उचांकी दर मिळाला आहे.
यंदा आंब्याची आवक ही कमी असल्याने व्यापाऱ्यांना चांगला दाम मिळेल असे बोलले जात आहे. आजपासून आंब्याच्या सिझनला सुरुवात होत आहे. पहिल्या दोन पेट्या कुणकेश्वर देवगड या भागातून सांगलीच्या फळ मार्केटमध्ये दाखल झाल्यानंतर गजानन फ्रुट एजन्सी समोर व्यापाऱ्यांनी या पेटीच पूजन करत स्वागत केले.
यावेळी एकूण आलेल्या दोन पेटी पैकी पहिल्या पेटीला व्यापाऱ्यांनी बोली लावत उच्चांक असा 4100 रुपयाचा दर घेतला आहे.
आज पहिल्या दोन पेटीचे पूजन झाल्यानंतर आता नियमितपणे आंब्याची आवक ही सांगलीच्या बाजारात सुरू होणार आहे. कोकणातील हापूस आंब्याला सांगलीमध्ये मोठी मागणी आहे. त्यामुळे आता हापूस आंब्याच्या या सिझनला सुरुवात झाली आहे.