लॉकडाऊनच्या काळात वाढीव वीज बिलाच्या मुद्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. मनसेनं सोमवारपर्यंत राज्य सरकारला अल्टीमेटम दिला आहे.
आता 26 नोव्हेंबर रोजी राज्यभरात मनसे मोर्चे काढणार आहे, अशी माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.
सरकारने वीज बिल दरवाढ मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर मनसेने आपला विरोध दर्शवत राज्य सरकारला सोमवार पर्यंतचे अल्टिमेटम दिले होते.
आता राज्य सरकारने काहीच निर्णय जाहीर न केल्याने मनसेने सर्वत्र बॅनरबाजी केली आहे.
मुंबईप्रमाणेच ठाण्यात देखील सोमवारच्या अल्टीमेटमची आठवण सरकारला करून देणारे बॅनर लावण्यात आले आहेत.
ठाण्यात वागळे इस्टेट येथे असलेल्या वीज कंपनीची मुख्य कार्यालयाच्या बाहेर मनसेकडून मोठा बॅनर लावण्यात आला आहे. या बॅनरवर वीज बिल दरवाढ मागे घेतली नाही तर संघर्ष अटळ आहे, असे सांगण्यात आलं आहे.
26 तारखेला मनसेतर्फे संपूर्ण राज्यात आंदोलन केले जाणार आहे. त्याआधी सरकारला मनसेकडून इशारा देण्यात आला आहे.
वीज बिल प्रकरणात मनसेनं राज्य शासनाला सोमवारपर्यंतची मुदत दिलेली आहे. सोमवारनंतर वीज बिल माफ केली नाही किंवा सवलत दिली नाही तर उग्र आंदोलन करू, असा इशारा मनसेने दिला आहे. इशाऱ्याची आठवण करून देणार फलक दादरमध्ये लावण्यात आले आहेत.
दादरचे विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्यावतीने अधिकृत असलेल्या जाहिरात फलकांवर असे पत्रक लावण्यात आले आहे. परंतु हे पत्र काढण्यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने संबंधित जाहिरात एजन्सीला धमकावले जात असल्याची माहिती मिळत आहे. महाराष्ट्र सरकार मनसेचे आंदोलन दडपून पाहत असल्याचा आरोप मनसेच्या वतीने करण्यात येत आहे.