राज्यातील कोरोना लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने हटवला जातो आहे. यासाठी सरकारने 5 टप्पे तयार केले आहेत. पॉझिटिव्ही रेट आणि ऑक्सिजन बेड्सनुसार हे टप्पे ठरवण्यात आले.
पाचपेक्षा कमी पॉझिटिव्ही रेट असलेले आणि 25 टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेड्स भरलेले जिल्हे पहिल्या कॅटेगिरीत असतील आणि तिथं लॉकडाऊन पूर्णपणे उठवला जाईल.
तर पाचव्या टप्प्यातील जिल्हे जिथं पॉझिटिव्ही रेट 20 टक्क्यांपेक्षा जास्त आहे, तिथं फक्त अत्यावश्यक दुकानंच सुरू राहतील.
दर गुरुवारी राज्याच्या आरोग्य विभागाद्वारे प्रत्येक जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटी रेट आणि ऑक्सिजन बेड्सचं प्रमाण जारी केलं जाणार आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासन निर्बंध लागू करणार आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाने 10 जूनला जारी केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात 20,697 ऑक्सिजन बेड्स भरलेले आहेत. हा दर 16.94 टक्के आहे. तर आठवड्याचा पॉझिटिव्ही रेट 5.81 टक्के आहे.
कोल्हापुरातील पॉझिटिव्हीटी रेट 15.85 टक्के आहे तर 67.41 ऑक्सिजन बेड भरलेले आहेत. राज्यातील सर्वाधिक पॉझिटिव्हीटी रेट आणि ऑक्सिजन बेड्सचं प्रमाण हे कोल्हापुरात आहे. त्यामुळे सध्या तरी कडक निर्बंध कायम असतील.
मुंबईचा पॉझिटिव्ही रेट 4.40 टक्के आहे आणि ऑक्सिजन बेड्स 27.12 टक्के फूल आहेत. पण मुंबई शहरात तिसऱ्या निर्बंध पुढील आदेशापर्यंत जसेच्या तसे लागू असणार आहेत.
मुंबई शहराची भौगोलिक रचना आणि लोकसंख्येच्या घनतेचे प्रमाण, मुंबई महानगर प्रदेशातून लोकल ट्रेनने दाटीवाटीने प्रवास, अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता कोविड 19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे शहरातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. राज्य सरकारने निश्चित केलेल्या या पाच स्तरांनुसार कोरोना संसर्गाचा पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांच्या आत असल्यास निर्बंध शिथिल करण्यात येतील.
पुण्यातील दुकाने आणि मॉल 14 जूनपासून सुरू होणार आहेत. ई-पास आवश्यक नाही.
पुण्याच्या शेजारील पिंपरी चिंचवडला अवघ्या पाव टक्के रुग्णवाढीमुळे निर्बंधांतून शिथिलता मिळालेली नाही. पिंपरी-चिंचवडचा पॉझिटिव्हिटी रेट हा 5.2 टक्के आहे. पिंपरी-चिंचवडमधील निर्बंध आठवडाभर कायम राहणार आहे.
सिंधुदुर्गमध्ये, रत्नागिरी आणि साताऱ्यात ऑक्सिजन बेड्स फूल होण्याचं प्रमाण हे अनुक्रमे 51.59, 51.59 आणि 41.06 टक्के आहे. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, पुण्याचा पॉझिटिव्ही रेट अनुक्रमे 14.12, 13.33, 11.8, 11.3, 11.11 टक्के आहे. त्यामुळे इथंही निर्बंध कायम राहतील.
गोंदियामध्ये सर्वात कमी 0.83 टक्के पॉझिटिव्ही रेट आहे. तर वर्ध्यात 1.57 टक्के ऑक्सिजन बेड्स भरलेले आहेत.