कोल्हापुरात पावसामुळे पंचगंगा नदीसह जिल्ह्यातील अनेक नंद्यांच्या पाणीपातळीत वाढ कायम राहिली आहे.
पंचगंगा नदीने 39 फुटांची इशारा पातळी ओलांडली असून ती सध्या 40 फुटांवरून वाहत आहे. तर नदीची धोका पातळी ही 43 फूट आहे.
कोल्हापूरच्या आंबेवाडी, चिखली परिसरातील नागरिकांचे स्थलांतर सुरू झाले आहे. कोल्हापूर शहरात उभारण्यात आलेल्या निवारा केंद्रांमध्ये, आपापल्या नातेवाईकांच्या घरी नागरिक स्थलांतरीत होत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात ठिकठिकाणी असणारे एकूण 83 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत.
कोल्हापुरातील महत्त्वाच्या धरणातील पाणीसाठा देखील वाढत असून राधानगरी धरण 90 टक्के आणि काळम्मावाडी धरण 49 टक्के पेक्षा जास्त भरले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक मार्ग सध्या रस्त्यावर पाणी आल्यामुळे बंद झाले असून दळणवळण ठप्प झाले आहे. तर बऱ्याच ठिकाणी धोकादायक पद्धतीने वाहतून होताना दिसत आहे.
दरम्यान कोल्हापूर जिल्ह्याला दिनांक 27 जुलै पर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.