महाराष्ट्र सरकारने ताम्हणला 1990 मध्ये राज्य फुलाचा दर्जा दिला आहे. मात्र ताम्हणचे फूल आणि वृक्ष सध्या महाराष्ट्रातच दूर्मिळ होत चालला आहे.
राज्य फूल असणारा ताम्हण वृक्ष कोकणात मोठ्या प्रमाणात आढळतो. सागवानाशी तुलना होत असल्याने त्याच्यावर कुऱ्हाड चालविली जाते. त्यामुळे मराठवाड्यासह विदर्भात या वृक्षाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
बीड जिल्ह्यातील सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्राने ताम्हण वृक्षाच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे. आष्टी तालुक्यापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर हा प्रकल्प आहे.
सर्पराज्ञी प्रकल्पात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड आणि जतन गेल्या काही वर्षांपासून केले जात आहे. तसेच या ठिकाणी प्राण्यांचेही संगोपन केले जाते.
या ठिकाणी असणारे ताम्हण वृक्ष फुलांनी बहरले असून त्याचे मनमोहक रूप सर्वांनाच आकर्षित करत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीलाच ताम्हण फुलांनी बहरून जातो. झाडाच्या फांदीच्या टोकावर एखाद्या मुकुटाप्रमाणे फुलांचा गुच्छ दिसून येतो.
लालसर-गुलाबी, जांभळ्या फुलांचा नाजूक सुंदर मुकुट परिधान केलेला हा वृक्ष मे महिन्याचे स्वागत करत सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. 'क्वीन ऑफ फ्लावर्स' आणि 'प्राईड ऑफ इंडिया' या नावानेही ताम्हणला ओळखले जाते.
ताम्हणच्या फुलाच्या पाकळ्या कागदासरख्या वाटणाऱ्या दुमडलेल्या झालरी सारख्या नाजूक व मुलायम असतात. फुलं सहा ते सात सेंटीमीटर व्यासाची असून फुलांच्या मध्यभागी पिवळे धमक नाजूक पुंकेसर असतात. या फुलांचा बहर दोन ते तीन महिने टिकतो.
ताम्हणच्या फुलांच्या रंगछटांमध्ये वातावरणानुसार बदल होत राहतो. या बदलामुळे ताम्हण वृक्षाला कधीकधी पांढऱ्या रंगाची फुले ही दिसून येतात. तसेच या वृक्षाचा वापर आयुर्वेदामध्ये विविध आजारांवर औषधी उपचारासाठी केला जातो.
ताम्हण वृक्षाच्या जतनासाठी सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र काम करत आहे. गत दोन वर्षांपूर्वी बियांपासून पाच हजार रोपे तयार करून ती निसर्ग प्रेमींना मोफत पुरवली. ताम्हणचे रोप प्रत्येक शाळा, महाविद्यालय परिसरात लावले जावे, असे वनस्पती अभ्यासक सिद्धार्थ सोनवणे म्हणतात.