औरंगाबाद, 15 ऑगस्ट : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान म्हणून ओळखलं जातं.मात्र अनेक नागरिक सुदृढ असतानाही रक्तदान करत नाही. यामुळे अनेक गरजू रुग्णांना अत्यावश्यक असताना देखील रक्त मिळत नाही. त्यांच्या नातेवाईकांना रक्तासाठी वन वन फिरावं लागतं. रक्तदान करण्यासंदर्भात नागरिकांमध्ये विविध गैरसमज आहेत आणि याच कारणांमुळे नागरिक रक्तदान करत नसल्याचं दिसून येत आहे. नागरिकांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी एमजीएम रुग्णालयातील विद्यार्थ्यांनी रेल्वे स्थानक परिसरामध्ये पथनाट्य करून नागरिकांमध्ये जनजागृती केली.
या विद्यार्थ्यांनी गोष्टीच्या माध्यमातून रक्तदानाचे महत्त्व सांगितले. या गोष्टीनुसार,'प्रशांत कदम हा उद्योगपती आहे. प्रशांत रस्त्याने जात असताना त्याला त्याचा मित्र देवेश देसाई भेटतो यावेळी देवेश म्हणतो की मी रक्तदान करायला चाललोय तू येतोस का? असे विचारतो. त्यावर प्रशांत देवेशला रक्तदान करत नाही असं म्हणत धुडकावून लावून निघून जातो.'
प्रशांत कदमचा काही अंतरावरअपघात होतो या अपघातामध्ये तो गंभीर जखमी होतो यावेळी राधिका वाघमारे ही एक मुलगी त्याला मदतीसाठी पुढे सरसावते नागरिकांना ती मदत करा अशी विनंती करते, पण त्यावेळी कुणीही मदतीसाठी पुढे येत नाही.
गंभीर अवस्थेत प्रशांतला शासकीय रुग्णालयात नेण्यात येते. त्यावेळी प्रशांतची परिस्थिती गंभीर असून त्याला तात्काळ रक्ताची गरज असल्याचं तेथील डॉक्टर आकांक्षा जाधव सांगतात.
सामाजिक कार्यकर्त्या समीक्षा दीक्षित या देखील प्रशांतला रक्त मिळावं म्हणून अनेकांना विनवणी करतात, पण त्यांनाही निराशा सहन करावी लागते.
'सर्वांनी रक्त डोनेट करा मानवतेला प्रमोट करा,' या घोषवाक्यासह या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्याला औरंगाबादकरांनी चांगला प्रतिसाद दिला. रेल्वे स्टेशन पोलीस अधिकाऱ्यांनी बक्षीस देऊन पथनाट्य सादर करणाऱ्या सर्व कलाकारांना प्रोत्साहन दिले.