शालेय विद्यार्थ्यांना सर्वांगिण शिक्षण देण्याची गरज असते. ग्रामीण भागातील बहुतांश मुले ही शेतकरी कुटुंबातील असतात. त्यामुळे त्यांना शाळेतच आधुनिक शेतीचे धडे मिळावेत यासाठी प्रयत्न केले जातात.
महाराष्ट्रातील काही आदर्श शाळांनी हा उपक्रम चांगल्या पद्धतीने राबविला असून त्याचा विद्यार्थ्यांना दुहेरी फायदा होत आहे. यासाठी पालकांचेही सहकार्य मिळत आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात असणारी नांदूर खंदरमाळ येथील लहूचा मळा जिल्हा परिषद शाळा उपक्रमशिल शाळा म्हणून ओळखली जाते.
लहूचा मळा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी खडकाळ जमिनीवर परसबाग फुलवली आहे.
लहूचा मळा या शाळेने पंतप्रधान पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत परसबाग तयार करण्याच्या स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. तर जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक मिळवला.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहूचा मळा येथे मुख्याध्यापक रोहिदास गाडेकर, उपशिक्षिका आशा गाडेकर हे दाम्पत्य गत चार वर्षांपासून कार्यरत आहे. उपक्रमशिल शिक्षक अशी त्यांची ओळख आहे.
शाळा खडकाळ जागेत असल्याने गाडेकर दाम्पत्याच्या संकल्पनेतून परसबागेचे नियोजन करण्यात आले. परिसरात मातीचा भराव करून गेटच्या आत वर्गासमोर परसबाग तयार करण्यात आली.
वाफे तयार करत कांदा, लसूण, बटाटा, मुळा, टोमॅटो, फ्लॉवर, कोथिंबीर, मिरची आदी पिकांची लागवड केली. विद्यार्थी स्वतःहून सहभागी झाले.
परसबागेत पाण्याचा कमी प्रमाणात वापर केला जातो. तसेच कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल, असे नियोजन केले आहे.
शाळेतील परसबागेत उत्पादित होणाऱ्या सेंद्रिय भाजीपाल्याचा वापर विद्यार्थ्यांच्या रोजच्या आहारात होतो. त्यामुळे जेवण रुचकर बनत आहे.
शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांत श्रमप्रतिष्ठेचे मूल्य रुजविण्यासाठी शाळेत परसबाग ही संकल्पना राबविण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना शेतीविषयक गोडी निर्माण झाली.