अनेक वर्ष नात्यात राहिल्यावर अचानक ते तुटणं कोणासाठीही वाईटच असतं. अशा परिस्थितीत कोणताही निर्णय घेणं सोपं नसतं. पण तुम्ही त्या नात्यात रहावं की राहू नये याचा निर्णय जर घेऊ शकत नसाल तर पुढील पाच गोष्टी तुम्हाला तुमच्या निर्णयापर्यंत यायला कदाचित मदत करतील.
सतत भांडणं- जर तुमच्यात सतत भांडणं होत असतील किंवा तुमचा पार्टनर जाणीवपूर्वक भांडण उकरून काढत असेल तर ते नातं तुमच्यासाठी योग्य नाही हे समजां. एवढंच नाही तर तुमच्या प्रत्येक गोष्टीचा पार्टनर चुकीचा अर्थ काढत असेल तर समजून जा की तुमचं नातं फार काळ टिकणार नाही.
संशय घेणं- जर तुमचा पार्टनर तुमच्यावर सतत संशय घेत असेल आणि कोणत्याही गोष्टीवर हजार प्रश्न विचारत असेल तर समजून जा की त्याचा तुमच्यावर अजिबात विश्वास नाही. या परिस्थितीत तुम्ही पार्टनरला विश्वासात घेण्याचा प्रयत्न करा. यानंतरही तुमच्यात या गोष्टीवरून वाद होत असतील तर तुमचं हे नातं फार काळ टिकणार नाही हे लक्षात घ्या.
बोलणं कमी होणं- कोणत्याही नात्याची सुरुवात उत्साहाने होते. मात्र जसा काळ पुढे जात राहतो नात्यातला उत्साह कमी होतो. अनेकदा खासगी आयुष्यात आपण एवढे व्यग्र होतो की एकमेकांसोबत बोलणंही होत नाही. अशा परिस्थिती जर तुमच्यात एकमेकांवरचा विश्वास अढळ असेल तर ते नातं टिकतं. पण तुम्ही तुमच्या आयुष्यात रमत असाल आणि एकमेकांशी बोलणं बंद केलं तर हे नातं फार काळ टिकणार नाही.
प्रामाणिकपणा- कोणत्याही नात्यात प्रामाणिकपणा आणि निष्ठा असणं आवश्यक आहे. जर तुम्ही एकमेकांसाठी निष्ठावान असाल तर कितीही कठीण प्रसंग आलं तर तुमचं नातं कधीच तुटू शकत नाही. मात्र तुमचा पार्टनर तुमच्याशिवाय दुसऱ्यासोबत भविष्याची स्वप्न रंगवत असेल तर तुमचं नातं संपुष्टात आलंय असं समजावं.
हिंसाचार होणं- कोणत्याही परिस्थितीत हिंसा करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. तुमचं नातं हिंसेपर्यंत गेलं असेल तर तुमच्यासाठी शारीरिकच नाही तर मानसिकरित्याही ते धोकादायक आहे. एवढंच नाही तर तुमचा पार्टनर तुम्हाला ब्लॅकमेल करत असेल किंवा मानसिक पातळीवर त्रास देत असेल तर तुम्हीच ते नातं लवकरात लवकर संपवावं.