सतत इतरांचा विचार करणे, आपल्याबद्दल कोण काय बोलतंय याचा विचार करत राहणं, सतत वाईट वाटणं, भावना अनावर होणं यामध्येच आपला दिवस आणि ताकद वाया जात असेल तर, यावर उपाय करणं आवश्यक आहे. भावना नियंत्रणात कशा ठेवायच्या आणि ओव्हर सेन्सिटिव्हिटी कशी कमी करायची याचे उपाय माहिती असायला हवेत.
ज्या कारणांमुळे भावना अनावर होतात त्याला ट्रिगर्स म्हटलं जातं. आपल्याला कोणत्या गोष्टीची आठवण आल्यामुळे किंवा एखाद्या व्यक्ती मुळे, परिस्थितीमध्ये त्रास होतोय हे ओळखून वागायला हवं. म्हणजेच हा ट्रिगर ओळखला तर उपायही करता येऊ शकतात.
आधी आपल्या स्वतःच्या भावना स्वतःला ओळखता येतात का हे पहावं. स्वतःच्या भावना ओळखून राहायला शिकल्यास आपण चांगलं आणि आनंदी आयुष्य जगू शकतो. राग, चिडचिड का होते हे समजून घेऊन त्यावर उपाय शोधा.
आजच्या धकाधकीच्या जीवनात आत्मचिंतन करणं महत्त्वाचं आहे. आत्मचिंतन केल्यामुळे आपण स्वतःला शांत करू शकतो. मानसिक ताकद वाढते.
दुसऱ्यांच्या मदतीची अपेक्षा करण्यापेक्षा स्वतःच स्वतःची मदत करा म्हणजे त्रास कमी होईल. आपण नेहमी दुसऱ्यांनी आपल्याला समजून घ्यावं हा प्रयत्न करतो. पण, स्वतःच स्वतःला समजण्यात कमी पडतो.
रोजच्या दगदगीमुळे भावना अनावर होत असतील तर, स्वतःला वेळ द्या. कामातून सुट्टी घेऊन आराम करा म्हणजे मेंदू रिलॅक्स होईल. याशिवाय छोटीशी ट्रिप प्लॅन करून स्वतः सोबत वेळ घालवा.
कामं वाढलेल्या आयुष्यामध्ये विरंगुळ्याचीही आवश्यकता असते. ज्या माणसांबरोबर राहिल्यामुळे आनंद मिळतो अशा लोकांबरोबर वेळ व्यतीत करण्याचा प्रयत्न करा.
जी गोष्ट आवडत नाही, करायची इच्छा नाही तिला स्पष्ट नकार द्यायला शिका. लोक आपल्याला शिष्ट, उर्मट, खडूस किंवा इगोइस्ट बोलतील याचा विचार करू नका. उलट ज्या परिस्थितीमुळे आपल्याला त्रास होणार आहे तिचा विचार करून सुरुवातीलाच नकार देणे योग्य असतं.
आपल्या हावभावाप्रमाणे आपला मेंदू आपल्यामध्ये तशा भावना निर्माण करतो. हे आता सिद्ध झालं आहे. त्यामुळे चेहरा हसरा ठेवा म्हणजे, राग कमी येईल. चेहरा प्रसन्न ठेवला, चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवलं तर, हळूहळू याची सवय होऊन चांगल्या भावना निर्माण व्हायला लागतील.
सर्वात जास्त त्रास हा लोकांकडे लक्ष दिल्यामुळे होतो. त्यामुळे दुर्लक्ष करायला शिकले पाहिजे. बरेच लोक माणसांना जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात. एखादी व्यक्ती भावनाशील आहे हे माहिती असेल तर, त्या व्यक्तीला एखादं वाक्य बोलून तिचा पूर्ण दिवस खराब करण्याचाही त्यांचा हेतू असू शकतो, अशी माणसं ओळखून त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला शिका.
एखादी घटना घडल्यानंतर त्रास होत असेल तर दीर्घ श्वास घ्या, मन शांत करा आणि दुसरीकडे लक्ष द्यायला सुरुवात करा. दीर्घ श्वास घेतल्यामुळे शरीराचा ऑक्सिजन पुरवठा वाढतो आणि मनातील नकारात्मक भावना कमी होतात.