पावसाळा म्हटलं की अनेक आजार आलेच. सर्दी-खोकला-ताप याशिवाय काही जणांना कफ आणि वाताची समस्याही या कालावधीत उद्धवते.
फुफ्फुसांचे आरोग्य टिकवण्यासाठी वात जास्त वाढून या ठिकाणी रुक्षता येऊ नये तसंच कफ जास्त वाढून ओलावा अधिक राहू नये याची काळजी घ्यावी लागते.
फुफ्फुसांची ताकद वाढवण्यासाठी आणि अशा समस्यांना दूर ठेवण्यासाठी आहारही तितकाच महत्त्वाचं आहे. याबाबत वेदिक्युर हेल्थकेअर अँड वेलनेसच्या आयुर्वेदाचार्य डॉ. वैशाली सावंत चव्हाण यांनी मार्गदर्शन केलं आहे.
तेल - बदाम तेल, सूर्यफुल तेल किंवा शुद्ध गायीचं तूप तसंच फुफ्फुसांचा ओलावा सामान्य राहण्यासाठी सूर्यफुलाच्या बियांची चटणी खावी.
धान्य - ज्वारी, बाजरी, मका यांचा आहारातील तुपाबरोबर केलेला समावेश कफ आणि वातास नियंत्रित ठेऊन फुफ्फुसांचं आरोग्य सुधारेल. आहारात गहू तसेच भाताचा समावेश कमी असावा.
मांसाहार - पचायला हलका असणारा मांसाहार घ्यावा. अंडी तसंच चिकनचा समावेश आहारात करावा.
मसाले - आलं, लवंग, दालचिनी, मिरी यांचा आहारातील माफक उपयोग कफाचं नियंत्रण करतोच आणि पचनशक्ती वाढवून रोगप्रतिकारशक्ती वाढवतो.
उष्णजल - उकळवून थंड झालेलं किंवा कोमट पाणी कफाचं नियंत्रण करून फुफ्फुसांना निरोगी ठेवतं.
दूध आणि दुधाचे पदार्थ - हळद किंवा आलं घालून उकळलेलं दूध पथ्यकर ठरतं. सुंठ घातलेलं ताक, गाईचे तूप चिमूटभर मिरी घालून घ्यावं.
फळं - डाळिंब, संत्री, मोसंबी, सफरचंद, चेरी इत्यादी फळांचा आहारात समावेश असावा. रात्री फलाहार, तसंच दुधाबरोबर फळांचे रस घेऊ नये.