दर आठवड्याप्रमाणे टीआरपी रेटिंग सगळ्यांच्या समोर आलंय. यावेळी एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे जागो मोहन प्यारे मालिका पहिल्या पाचात आलीय. तिनं 'चला हवा येऊ द्या' मालिकेला पहिल्या पाचातून बाहेर फेकलंय. ही मालिका पाचव्या नंबरवर आहे. यात गरीब नवरा, कजाग बायको आणि नवऱ्याला समजून घेणारी घरातली कामवाली बाई अशी ही त्रिसूत्री. अतुल परचुरे, सुप्रिया पाठारे आणि श्रुती मराठे यांची जुगलबंदी चांगलीच रंगलीय.
'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेनं गेल्या वेळी दुसरा नंबर पटकावला होता. या वेळी मात्र ही मालिका चौथ्या स्थानावर आलीय. गेल्या आठवड्यात संभाजीची आदिल खानाकडून सुटका झाली होती. त्यावेळी मालिकेत खूप अॅक्शन होती. या आठवड्यात मात्र ही मालिका थोडी संथ झालेली. त्यामुळे टीआरपीवर परिणाम झाला असावा.
'तुझ्यात जीव रंगला' मालिकेनं आपलं स्थान कायम ठेवलंय. गेली अनेक आठवडे ही मालिका तिसऱ्या नंबरवर आहे. याही आठवड्यात ही मालिका नंबर तीनवरच आहे. आहेत तेवढेच प्रेक्षक या मालिकेत रंगलेत. झी अॅवाॅर्डमध्ये पाठकबाईंना सर्वोत्कृष्ट नायिकेचा पुरस्कारही मिळालाय.
गेल्या वेळी 'तुला पाहते रे' चौथ्या स्थानावर होती. यावेळी ती दुसऱ्या नंबरवर आलीय. रविवारी झालेल्या महाएपिसोडचा हा परिणाम असावा. विक्रांत आणि ईशाची प्रेमकहाणी आता रंजक वळणावर पोचलीय. बंगलोरला जायला निघालेल्या विक्रांतनं तिची बस थांबवून तिला परत आणलं. पण अजूनही तो तिचं प्रेम व्यक्त करत नाहीय. ईशाही इरेला पेटलीय. लोकांची उत्सुकता वाढवायला मालिका यशस्वी ठरलीय.
याही टीआरपी रेटिंग्जमध्ये पहिल्या पाचमध्ये झी मराठीच्याच मालिका आल्यात. इतर कुठलीही वाहिनी पहिल्या पाचमध्ये फिरकल्याही नाहीत.
आणि पुन्हा एकदा 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेनं आपलं स्थान अबाधित ठेवलंय. गेले अनेक आठवडे ही मालिका नंबर वनवरच आहे. आता तर शनाया आणि राधिका एकत्र आल्यात. दोघी मिळून गुरूला धडा शिकवतायत. शनाया गुरूकडून सगळी गुपितं काढून घेतेय. या वेगळ्या ट्विस्टचा फायदा टीआरपीमध्ये झाला असावा.