टोकयो, 26 जुलै: टोकयो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या अनुभवी टेबल टेनिस (Table Tennis) खेळाडूंनी पदकाची आशा कायम ठेवली आहे. रविवारी महिलांमधील अव्वल खेळाडू मानिका बत्रानं (Manika Batra) विजय अक्षरश: खेचून आणला होता. त्यापाठोपाठ सोमवारी सकाळी झालेल्या लढतीत देशाचा सर्वात अनुभवी खेळाडू शरथ कमलनं (Sharath Kamal) दुसऱ्या फेरीत विजय मिळवला आहे. 39 वर्षांच्या शरथ कमलची ही चौथी ऑलिम्पिक स्पर्धा आहे. त्याने दुसऱ्या फेरीत पोर्तुगालच्या टियागो एपोलोनियाचा पराभव केला. सात गेमचा हा सामना कमलनं सहा सेटमध्येच 2-11,11-8,11-5,9-11,11-6,11-9 असा सहा सेटमध्ये जिंकला. कमलची सुरुवात संथ झाली. त्यानं पहिला गेम 2-11 अशा मोठ्या फरकानं हरला. पहिला गेम हरल्यानंतर कमलनं पुनरागमन करत दुसरा गेम 11-8 तर तिसरा 11-5 असा जिंकला. पोर्तुगालच्या टियागोनं चौथा गेम जिंकत बरोबरी साधली. त्यानंतर कमलनं त्याचा सारा अनुभव पणाला लावत पुढील दोन गेम 11-6, 11-9 या फरकानं जिंकत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.
भारतीय तिरंदाजांचा अचूक ‘लक्ष्य भेद’, पराभवानंतरही भवानीनं रचला इतिहास शरथ कमल हा भारताचा आजवरचा सर्वात दिग्गज टेबल टेनिसपटू मानला जातो. जागतिक पातळीवर वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये विजतेपद पटकावणाऱ्या कमलला ऑलिम्पिक मेडलनं आजवर नेहमीच हुलकावणी दिली आहे. त्याची ही शेवटची ऑलिम्पिक स्पर्धा असून या स्पर्धेत मेडल जिंकण्याच्या उद्देशानं तो खेळत आहे.