राधाकृष्ण विखे पाटील
हरीष दिमोटे, प्रतिनिधी शिर्डी, 15 मे : अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावमध्ये दोन गटात झालेल्या राड्यासह राज्यात वाढत असलेल्या हिंसाचाराच्या घटनांबाबत कठोर भूमिका घेणार असल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हंटलं. शहरात शस्र येतात आणि पोलीस प्रशासनाला माहीत होत नाही? असा प्रश्न उपस्थित करत विखे पाटलांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. अहमदनगर शेवगाव येथील दंगल प्रकरणाची माहिती घेण्यासाठी पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेवगाव येथील दंगल ग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळेस त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. काय म्हणाले विखे पाटील? शेवगावचा प्रकार दुर्दैवी असून प्रार्थना स्थळात दगड आणि शस्त्र आणून ठेवल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आधी हनुमान जयंती आता धर्मवीर संभाजीराजे जयंतीत असे प्रकार घडत असून काही लोक विघ्न आणण्याचा मुद्दाम प्रयत्न करत आहेत. ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत अशा घटना घडतील त्या पोलीस निरीक्षकावर कारवाई करणार असल्याचे तसेच शेगावच्या घटनेमागे जो कोणी गुन्हेगार असेल त्याच्यावर मोक्कासह कडक कारवाई करण्याचा इशारा अहमदनगर जिल्ह्यातीचे पालकमंत्री विखे पाटील यांनी दिला. वाचा - किशोर आवारे हत्या प्रकरणात राष्ट्रवादीच्या आमदाराला होणार अटक? कर्नाटक निकालानंतर पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणारे कोण होते? विनाकारण महाराष्ट्राचे राजकारण गढूळ करण्याचा प्रयत्न असून ज्यांचा पक्ष राहिला नाही, आमदार, खासदार राहिले नाही अशांनी आरोप करू नये. वैफल्यग्रस्त झाल्याने ठाकरे गटाकडून आरोप केले जातात, असे प्रतिउत्तर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हिंसाचाराला सरकारचा पाठिंबा असल्याच्या आरोपावर दिले आहे. आमचे सरकार असल्याने काही मंडळी जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून काही लोक प्रक्षोभक वक्तव्य करून त्याला खतपाणी घालत आहेत. सरकारची भूमिका एकदम स्पष्ट असून कोणत्याही विशिष्ट जातीला संरक्षण देण्याचा प्रश्न येत नाही. कोणी जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही बघ्याची भूमिका घेणार नाही असा इशारा देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. चंद्रकांत खैरे यांच्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. चार-पाच वेळा त्यांनी प्रतिनिधित्व केले, अशी प्रक्षोभक विधाने करून ते स्वतःची प्रतिमा का मलिन करताय? असा प्रश्न महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी चंद्रकांत खैरे यांना केला. इम्तियाज जलील भाजप पुरस्कृत उपोषणाला बसले आणि दंगली घडल्याचा आरोप खैरे यांनी केला. त्यावर विखे पाटलांनी प्रतिक्रिया दिली.