रावसाहेब दानवेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
जालना, 17 जून, रवी जैस्वाल : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे कायम आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा दानवे चर्चेत आले आहेत. ‘यांना आपण पैसे दिले हे आपल्यालाच मतदान करणार आहेत’ असं अजब वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलंय. जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातील रोषणगाव येथील रस्त्याचं दानवेंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी दानवेंनी बोलताना हे अजब वक्तव्य केलंय. वाद निर्माण होण्याची शक्यता आमदार नारायण कुचे यांनी मला सांगितलं यांना आपण पैसे दिले हे आपल्याला मतदान करणार आहेत. त्यामुळं गावातल्या लोकांनी एकच शिक्का चालवा असं दानवे यांनी म्हंटलं आहे. दानवे पुन्हा एकदा आपल्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला देखील जोरदार टोला लगावला आहे. काँग्रेसवाले निवडणुकीच्या वेळी मुस्लिम बांधवांना बैहकवतात, आणि आम्हाला जातीयवादी म्हणतात. शरद पवारही भाजपला जातीयवादी म्हणतात, असं दानवे यांनी म्हटलं आहे. दरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विरोधकांची बैठक बोलावली, यावरून देखील दानवे यांनी नितीश कुमार यांना जोरदार टोला लगावला आहे. नितीशकुमार यांना पंतप्रधान व्हायचं आहे, म्हणून त्यांनी विरोधकांची बैठक बोलावली असल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे.