मुंबईतील चार ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती देणाऱ्या तरुणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबई, 07 ऑगस्ट: काल रात्री उशीरा रेल्वे विभागाला (Railway Department) एका निनावी फोन (Unknown call) प्राप्त झाला होता. फोनवरील व्यक्तीनं मुंबईतील सीएसएमटी, दादर, भायखळा आणि अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर बॉम्ब ठेवल्याची (Bomb threat in mumbai) माहिती दिली होती. या माहितीनंतर मुंबई पोलिसांसह (Mumbai police) बॉम्ब शोधक पथकाची (Bomb squad) झोप उडाली आहे. त्यांनी रात्रभर संबंधित सर्वठिकाणी शोधमोहीम राबवण्यात आली आहे. मात्र पोलिसांना कुठेही संशयास्पद वस्तू आढळली नाही. यानंतर, मुंबई पोलिसांनी या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत मोबाइल लोकेशनच्या आधारावर निनावी फोन करणाऱ्या तरुणांचा शोध घेतला आहे. अवघ्या काही तासांच्या आत मुंबई पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे. राजू अंगारे आणि रमेश शिरसाट असं अटक केलेल्या आरोपींची नावं असून दोघंही मूळचे जालना येथील रहिवासी आहेत. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी दारूच्या नशेत पोलिसांना फोन करून ही खोटी माहिती दिली आहे. दोन्ही आरोपींना ठाण्यातून ताब्यात घेण्यात आलं आहे. हेही वाचा- पती अन् त्याच्या मैत्रिणीचा FBवर विकृत उद्योग; छळाला कंटाळून शिक्षिकेनं दिला जीव आरोपी तरुणांनी गटारी पार्टीत धुंद असताना पोलिसांना फोन करून ही खोटी माहिती दिल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. आरोपींनी तरुणांनी पोलिसांना फोन करून त्यांना कामाला लावल्यानंतर फोन बंद करून ठेवला होता. त्यामुळे नक्की भानगड काय आहे? हे पोलिसांना देखील माहीत नव्हतं त्यामुळे मुंबई पोलिसांसह बॉम्ब शोधक पथकानं संबंधित ठिकाणी रात्रभर शोधमोहीम राबवली आहे. दारू पिऊन नको ते कृत्य केल्यानं पोलिसांना देखील बराच मनस्ताप सहन करावा लागला आहे. हेही वाचा- मुंबईत CSMT, दादर, भायखळा आणि बिग बींच्या घराबाहेर बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन मुंबई पोलीस किती सतर्क आहेत, हे तपासण्यासाठी आम्ही हा फोन केला होता, असा दावा आरोपी तरुणांनी केला आहे. तरुणांच्या एका फोनमुळे मुंबई पोलिसांची सर्व यंत्रणा कामाला लागली होती. पोलिसांनी दोन्ही आरोपींनी ठाणे परिसरातून अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींना जेव्हा ताब्यात घेतलं तेव्हा दोघंही मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आपण गंमत म्हणून हा खोटा फोन केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.