लखीमपूर, 15 सप्टेंबर : उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लखीमपूरी खैरी भागातील निघासन कोतवाली परिसरात दोन अल्पवयीन सख्या बहिणींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले आहेत. (Uttar Pradesh Double Murder Case) यामुळे परिसरात याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.
दरम्यान पोलिसांनी नातेवाइकांच्या तक्रारीवरून 2 नामांकित आणि 3 अनोळखी लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस भादंविच्या कलम 302, 323, 452 आणि 376 नुसार गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास करत आहेत. दुचाकीवरून आलेल्या चार जणांनी दोन्ही अल्पवयीन मुलींना घरातून पळवून नेले, बलात्कार करून त्यांची हत्या करून मृतदेह झाडाला लटकवल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
ही संपूर्ण घटना निघासन कोतवाली परिसरातील तमोलिन पूरवा गावामध्ये घडली आहे. दोन अल्पवयीन सख्या बहिणींचे मृतदेह सापडल्यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवत पोलीस स्टेशनला टाळे ठोकले. संतप्त झालेल्या कुटुंबीयांची आणि जमावाची समजूत काढल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी लखीमपूर खेरी येथे पोस्टमॉर्टमला पाठवले. आज (दि.15) सकाळी आठ वाजता तीन डॉक्टर आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत दोन्ही मुलींच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.
हे ही वाचा : पतीच्या घर बांधण्याच्या हौसेनं घेतला विवाहितेचा जीव; बीडमधील धक्कादायक घटना
घटनेची माहिती मिळताच लखनऊ रेंजच्या आयजी लक्ष्मी सिंह घटनास्थळी पोहोचत त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत छोटू नावाचा तरुण आणि गावातील रहिवासी असलेल्या तीन अनोळखी लोकांवर दोन सख्ख्या बहिणींचे अपहरण करून त्यांच्यावर बलात्कार करून मृतदेह झाडाला लटकवल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान घटनास्थळी मोठा पोलीस फौजफाटा तैणात केल्याने कोणताही अनुचीत प्रकार घडला नाही.
आयजी लक्ष्मी सिंह यांनी सांगितले की, मृत बहिणींच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई केली जाईल. दोषींना योग्य ती शिक्षा दिली जाईल गुन्हा सिद्ध होईपर्यंत कोणालाही सोडणार नसल्याचे त्या म्हणाल्या.
हे ही वाचा : बुलढाण्यात किडनॅप करण्याचा कट उधळला, दोन बड्या हस्तींचा अपहरणाचा होता प्लॅन
फॉरेन्सिक टीम या प्रकरणातील सर्व पैलूंचा तपास करेल. सध्या छोटूसह अन्य तीन जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू आहे. दुसरीकडे गावातील तणाव पाहता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.