वाराणसी 15 मार्च : एमआयएम (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवैसी (AIMIM chief Asaduddin Owaisi) यांनी उत्तर प्रदेशमधील घटनांबद्दल माहिती देत योगी सरकारवर निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेशमधील बलरामपूर येथे झालेल्या एका सभेदरम्यान हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी राज्यातील एन्काऊंटरमध्ये मुस्लिमांना निशाणा केलं जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले की जेव्हापासून भाजपचं सरकार आलं आहे, तेव्हापासून या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 2017-2020 या काळात उत्तर प्रदेशात तब्बल सहा हजार एन्काऊंटर झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यात मारले गेलेले 37 टक्के मुस्लीम असल्याचा दावा त्यांनी केला आहे. अखेर हा अत्याचार का? असा सवालही त्यांनी केला आहे. योगी सरकार पुन्हा येणार नाही - ओवैसी यांनी असा आरोप केला आहे, की उत्तर प्रदेशात संविधान राज नाही. याठिकाणी संविधानाचं अजिबातही पालन होत नाही. पुढे ओवैसी म्हणाले, तो दिवसही लवकरच उजडेल जेव्हा उत्तर प्रदेशात योगी सरकार येणार नाही.
ओवैसी देशात फूट पाडण्याच्या प्रयत्नात - असदुद्दीन ओवैसींच्या या वक्तव्याला उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री मोहसिन रजा यांनी दिलं आहे. ते म्हणाले, की असदुद्दीन ओवैसींनी लोकांना सल्ला द्यायला पाहिजे, की अपराध्यांमध्ये इतकं जास्त प्रमाण का आहे. ओवैसींनी प्रत्येकाला समजवायला हवं, की बॅरिस्टर बना, गुन्हेगार कोणीच बनू नका. ओवैसींचे पूर्वज हे देशात फूट पाडणारे होते. आज ओवैसी ज्या प्रकारचं वक्तव्य करत आहेत, हेदेखील याच गोष्टीचे संकेत आहेत.