प्रियाली सूर,उत्तराखंड
26 जून : महाप्रलयानंतर उत्तराखंडसमोर आता साथीच्या आजारांचं संकट उभं ठाकलंय. स्वच्छ पाण्याच्या तुटवड्यामुळे डायरियासारखे आजार बळावत आहेत. तर दुसरीकडे पुरात दगावलेल्यांच्या पार्थिवावर लवकरात लवकर अंत्यसंस्कार करण्यात आले नाही तर साथीचे रोग पसरण्याची भीती आहे.
7 किलोमीटरचा टप्पा पायी पार करत आमची टीम रामपूर गावात पोहचली. रस्ते वाहून गेल्यानं आणि वीजही नसल्यामुळे गेल्या 11 दिवसांपासून या गावाचा जगाशी संपर्क तुटलाय. पण, सध्या सर्वात जास्त भीती आहे ती रोगराई पसरण्याची..रामपूर, सीतापूर आणि सोनप्रयाग गावांमध्ये गेल्या तीन दिवसात 300 गावकरी आजारी पडलेत.
पण, या आजारांना आताच साथीचे आजार म्हणता येणार नाही, असं डॉक्टर्स सांगतात. संपर्क तुटलेल्या अशा अनेक गावांमध्ये रोगराई पसरण्याची भीती असली तरी समाधानाची बाब म्हणजे इथे डॉक्टर्स पोचलेत. पण, केदारनाथ सारख्या ठिकाणी जिथं मृतदेहांचा खच पडलाय, तिथे मात्र लवकरात लवकर मृतदेहांवर अंत्यसंस्कार होण्याची गरज आहे.