मुंबई, 8 मार्च : आज जगभरात जागतिक महिला दिन (International Women’s Day) साजरा होत आहे. महिला दिनाच्या निमित्ताने महिला शक्तीचा जागर केला जात आहे. आजच्या दिनाच्या निमित्ताने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी तमाम महिलांना शुभेच्छा दिल्या आहे. तसंच ‘मुळात महिला दिन हा वर्षातून एकदाच का साजरा करायचा? असा सवालही त्यांनी केला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महिला दिनाच्या निमित्ताने एक पोस्ट शेअर करत आपले रोखठोक मत मांडले आहे. ‘आज जागतिक महिला दिन. मुळात महिला दिन हा वर्षातून एकदाच का साजरा करायचा हे मला समजत नाही. आमचे आजोबा, प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे, “बांधवांनो, महिलांबद्दल जितका-जितका आदर तुम्ही आपल्या अंतःकरणात साठवत जाल, वाढवत जाल तितके शिवराय तुमच्यावर फार प्रसन्न होतील” त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जशी 365 दिवस साजरी व्हायला हवी तसंच महिलांचा म्हणजे खऱ्या अर्थाने ह्या जगतनियंत्याचा सन्मान 365 दिवस साजरा झाला पाहिजे’ असं परखड मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं.
‘मी मागे एकदा एका भाषणात माता-भगिनींना उद्देशून जे बोललो होतो ते आज पुन्हा सांगतो; तुम्हाला कोणी सक्षम करण्याची गरज नाही तुम्ही स्वतः सक्षमच आहात. तुम्ही तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून आणि दुसऱ्या स्त्रीचं दुःख आपलं मानून कृती करू लागलात तर जगात कुठल्याच स्त्रीवर अन्याय होऊ शकणार नाही’ असं मतही राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. Maharashtra budget LIVE : काही तासांत अजित पवार मांडणार राज्याचा अर्थसंकल्प ‘राजकारणात किंवा समाजकारणात कार्यरत असणाऱ्या महिलांनाही माझं आवर्जून सांगणं आहे तुम्ही कोणाचंही प्यादं बनून रहायची गरज नाही, तुम्ही थेट निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हा, तुम्हाला अपेक्षित बदल तुम्हीच घडवू शकता आणि जग बदलवू शकता’ असं म्हणत राज ठाकरे यांनी सर्व महिलांना आजच्या दिनाच्या शुभेच्छा दिल्या.