मंत्रिमंडळ नसलं तरी कामं थांबलेली नाही. लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, विरोधकांना जे वाटत आहे,
मुंबई, 16 जुलै : एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन होऊन 15 दिवस उलटले आहे पण अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. अखेरीस यावर खुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. मंत्रिमंडळ नसलं तरी कामं थांबलेली नाही. लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, विरोधकांना जे वाटत आहे, तसं काही नाही, असं शिंदे यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यमंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शिंदे यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य केलं. ‘संजय राऊत काय बोलतात आता मला त्यांच्यावर बोलण्याची गरज नाही. रोज सकाळी उठून तेच काम करत असतात. राज्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यासाठी आम्ही पाहणी करत आहोत. शेजारी राज्यांशी आम्ही बोलत आहोत. कुणी पुरात अडकू नये, याची खबरदारी घेण्यासाठी आम्ही काम करत आहोत. पेट्रोल-डिझेलचे दर आम्ही कमी केले आहे. नियमित कर्ज फेडणाऱ्यांना कर्ज सवलत दिली जाणार आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, त्यामध्ये कोणतीही अडचण नाही, असं शिंदे म्हणाले. ( असंसदीय शब्द, आंदोलनावरील बंदीनंतर आता संसदेत ‘या’ गोष्टीवरही निर्बंध ) मंत्रिमंडळ नसलं तरी कामं थांबलेली नाही. लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, विरोधकांना जे वाटत आहे, तसं काही नाही. आम्ही काम करत आहोत, निर्णय घेत आहोत, लवकरच विस्तार होईल, असंही शिंदे यांनी सांगितलं. तर, ‘विरोधकांनी लाईन ही डेड झाली आहे, त्यांना डेडलाईन हवी आहे, तर लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तर, या बैठकीमध्ये औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याचा निर्णय झाला आहे. त्याचबरोबर नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ असे नामकरण करण्याचा निर्णय झाला आहे. एमएमआरडीएला ६० हजार कोटींचे कर्ज उभारण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली आहे तसंच पहिल्या टप्प्यात १२ हजार कोटींच्या रकमेस शासन हमी देणार आहे, असंही शिंदे यांनी सांगितलं. ( Doomsday : पृथ्वीवर होणार महाप्रलय! नद्यांकडून मिळालाय धोक्याचा इशारा ) औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर कऱण्याचा निर्णय आधीच्या सरकारने घेतला होता. त्यांनी उस्मानाबाद आणि नवी मुंबई विमानतळाबाबतही घेतला होता. पण सरकार अल्पमतात असल्यामुळे या निर्णयाला कुणी आव्हान दिले असते तर अडचणीचे ठरले असते म्हणून निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. आज आम्ही दिलेल्या शब्दांप्रमाणे तिन्ही निर्णय घेतले आहे, असं शिंदे यांनी सांगितलं. तर, मावळत्या सरकारचे जबाबदारी झटकण्याचे निर्णय नाही तर उगवत्या सुर्याप्रमाणे जबाबदारी घेऊन निर्णय घेण्यात आले आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं.