तुंगारेश्वर नदीत वाहून जाणाऱ्या तिघांना वाचवले
राजा मयाल, वसई, 22 जुलै : गेल्या आठवड्याभरापासून राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. नद्या ओसंडून वाहू लागल्या असून धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे. धबधबे पाहण्यासाठी गेल्यानंतर अनेक दुर्घटना घडल्याचंही समोर आलं आहे. पोलीस आणि प्रशासनाने धबधब्यांचा प्रवाह वाढल्याने पर्यटकांना धोकादायक ठिकाणी जाऊ नये असं आवाहन केल्यानंतरही अशा ठिकाणी गर्दी होत आहे. यातून काही दुर्घटनाही घडत आहेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून यामध्ये बंधाऱ्यात अडकलेला तरुण दिसत आहे. पाण्याच्या प्रवाहामुळे त्याला बाहेर काढणं कठीण होत होतं. हा व्हिडीओ तुंगारेश्वर इथला असून तीन तरुण अडकले होते त्यांना वाचवण्यात आलं आहे.
मुसळधार पावसामुळे वसईतील तुंगारेश्वर धबधबा ओसाडूंन वाहत आहे. पण पावसामुळे होणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तुंगारेश्वर धबधब्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी घातली आहे. तरीही पर्यटक धबधबा परिसरात गर्दी करत आहेत. यात हुल्लडबाजी करणाऱ्यांची संख्याही जास्त आहे.
वसईच्या तुंगारेश्वर नदीत तीन पर्यटक अडकले होते. त्या तिघांचा जीव वाचवण्यात यश आलं आहे. तुंगारेश्वरच्या नदीतील सुरक्षाच्या जाळीत पोहताना तरुण अडकला होता. महाराष्ट्र सुरक्षा फोर्सच्या जवानांनी स्थानिक पर्यटकांच्या मदतीने 3 जणांना सुखरूप बाहेर काढले. ही घटना 18 जुलै रोजी दुपारी घडली होती.
तुंगारेश्वर नदीतला हा व्हिडीओ आता समोर आला आहे. पर्यटकांना वाचवणाऱ्या जवानांची नावे सतीश चव्हाण, मनोज पाटील, संदीप मराठे, महेश आटोळे आणि रवी मराठे अशी आहेत. पालघर जिल्ह्याला मागच्या 4 दिवसापासून रेड अलर्ट आहे. प्रशासनाने सतत आवाहन केल्यानंतरही पर्यटक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत.