मुंबई, 7 जून : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची हिंदुत्त्वाची भाषा समाजवादी पक्षाला (Samajwadi Party) खटकत आहे. महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi) हे हिंदुत्त्ववादी सरकार आहे की सेक्युलर सरकार आहे? असा प्रश्न समाजवादी पक्षाला वारंवार पडताना दिसत आहे. महाविकास आघाडीकडून अल्पसंख्याक समाजाकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप समाजवादी पक्षाकडून याआधीपासूनच केला जातोय. विशेष म्हणजे राज्यसभा निवडणुकीबाबत (Rajya Sabha Election 2022) चर्चा समोर आल्यानंतर समाजवादी पक्षाच्या नेत्यांचे मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलेल्या पत्राचीदेखील बातमी समोर आली. त्यामुळे समाजवादी पक्ष महाविकास आघाडी सरकारवर नाराज असल्याची चर्चा होती. राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला साथ देणार का? असा प्रश्ना समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी (Abu Azmi) यांना विचारला असता त्यांनी वरिष्ठांना विचारुन निर्णय घेऊ, असं उत्तर दिलं. त्यामुळे समाजवादी पक्ष राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पाठ दाखवणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. या दरम्यान आज एक महत्त्वाची घटना घडली. समाजवादीचे आमदार रईस शेख (Raees Shaikh) यांनी आज परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांची हिंदुत्वाची भावना खटकत असल्याची प्रतिक्रिया दिली. रईस शेख नेमकं काय म्हणाले? “अनिल परब माझे मित्र आहेत. मी त्यांना नेहमी भेटतो. राज्य सरकारमध्ये कॉमन मिनिमम प्रोग्रॅमवर आम्ही सोबत आहोत. पण मुख्यमंत्री गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्त्वाची भाषा करत आहेत. यावर त्यांनी स्पष्टीकरण द्यावे असे आमचे म्हणणे होते. आमचे अध्यक्ष अबू आझमी यांनी फक्त शिवसेनेला नाही तर महाविकास आघाडीला प्रश्न विचारले होते. सरकार सेक्युलर आहे की नाही?”, असा सवाल त्यांनी केला. “आम्ही महाविकास आघाडीसोबत आहोत. भाजप आणि आमचे वैचारिक मतभेद आहेत. पण अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारमध्ये बदल झाला आहे. आम्ही संध्याकाळच्या बैठकीला जाणार नाहीत”, असं स्पष्टीकरण रईस शेख यांनी दिलं. ( अखेर एकनाथ खडसेंना राजकीय लॉटरी लागणार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोठा निर्णय ) दरम्यान, “घटक पक्ष, अपक्ष आमदारांसोबत चर्चा सुरू आहे. रईस शेख भेटायला आले होते. त्यांच्याशीदेखील चर्चा झाली. कोण काय म्हणतंय हे निवडणुकीनंतर स्पष्ट होईल. कुठलाही पक्ष आम्ही जिंकू असंच म्हणत असतो”, अशी प्रतिक्रिया अनिल परबांनी दिली. महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ही निवडणूक भाजप आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची लढाई बनली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमींवर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची हॉटेलवारी सुरु आहे. राज्यसभेची निवडणूक तीन दिवसांवर आली असल्याने राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार मुंबईत दाखल झाले असून त्यांची फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची आज ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत तीनही पक्षांचे ज्येष्ठ नेते आमदारांना राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करणार आहेत.