Rajya Sabha: 'सपा'ची 2 मते कुणाला? CMच्या भेटीनंतर अबू आझमींनी घेतला मोठा निर्णय
मुंबई, 8 जून : राज्यसभेच्या सहा जागांसाठी (Rajya Sabha Election 2022) सात उमेदवार रिंगणात उतरल्याने या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सहावी जागा जिंकण्यासाठी आवश्यक असलेली मते कुठल्याच पक्षाकडे नाहीयेत. त्यामुळे भाजप (BJP) आणि शिवसेना (Shiv Sena) या दोन्ही पक्षांना आपल्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी लहान पक्ष, अपक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. या निवडणुकीत एक-एक मताला महत्त्व प्राप्त झालं आहे. शिवसेना, भाजप यांच्याकडून अपक्ष आणि लहान पक्षांच्या आमदारांची मते मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच दरम्यान समाजवादी पक्षाचे अबू आझमी (Abu Azmi) हे आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी भेट घेतली. वर्षा निवासस्थानी समाजवादी पक्षाचे दोन्ही आमदार दाखल झाले. यानंतर अबू आझमींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा केली. या भेटीनंतर अबू आझमी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. अबू आझमी यांनी म्हटलं, आज मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी मी त्यांच्यासमोर मागण्यांचा पाढा वाचला. माझ्या मागण्यांच्या संदर्भात सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. वाचा : विधानपरिषदेसाठी पंकजा मुंडेंचे नाव का नाही? चंद्रकांत पाटील म्हणाले, “पंकजाताईंच्या उमेदवारीसाठी आम्ही खूप प्रयत्न केले पण….” समाजवादी पक्षाचे दोन्ही आमदार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सकारात्मक बैठक झाली. त्यामुळे आता समाजवादी पक्षाची दोन्ही मतं ही महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मिळणार हे स्पष्ट झालं आहे. समाजवादी पक्षाची दोन्ही मते मिळवण्यात मविआला यश आलं आहे. भाजपच्या पाठिशी कोण? भाजपचे 106 आमदार भाजपला पाठिंबा देणारे छोटे पक्ष व अपक्ष आमदार - 7 1) रासपचे राहूल कूल 2) जनसुराज्यचे विनय कोरे 3) रवी राणा 4) प्रकाश आवाडे 5) राजेंद्र राऊत 6) रत्नाकर गुट्टे 7) महेश बालदी,उरण एकूण - 113 आमदार भाजप आमदार लक्ष्मण जगताप गंभीर आजारी असल्यानं येणार नाहीत. त्यामुळं भाजपची मतं 112 होतील. दोन उमेदवारांना 84 मते दिल्यानंतर 28 मते शिल्लक राहतात. धनंजय महाडिकांना विजयासाठी पहिल्या पसंतीची आणखी 14 मतांची गरज पडणार आहे. भाजप धनंजय महाडिक यांना जिंकून आणण्यासाठी मोठा घोडेबाजार करणार हे आता उघड झालंय. तसे संकेतही भाजपच्या नेत्यांनी दिलेत. महाविकास आघाडीची मोर्चेबांधणी 1) शिवसेना - 55 2) राष्ट्रवादी काँग्रेस - 53 3) काँग्रेस - 44 4) सपा - 2 5) प्रहार - 2 6) स्वाभिमानी शेतकरी - 1 मविआ समर्थक इतर आमदार अपक्ष आमदार संख्या - 9 1) शंकरराव गडाख, अहमद नगर 2) राजेंद्र पाटील-येड्रावकर, कोल्हापूर 3) मंजुषा गावित, धुळे 4) गिता जैन, मीरा-भाईंदर 5) आशिष जयस्वाल, रामटेक 6) किशोर जोरगेवार, चंद्रपूर 7) चंद्रकांत पाटील, जळगाव 8) विनोद अगरवाल, गोंदिया 9) संजय शिंदे, करमाळा एकूण 166 आमदार (नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना कोर्टाने मतदान करण्यास परवानगी न दिल्यास 164) 164 आकडा धरल्यास 3 उमेदवारांना प्रत्येकी 42 मते दिल्यानंतरही महाविकास आघाडीकडे 38 मते शिल्लक राहतात. म्हणजे विजयासाठी 3 मतांची गरज भासणार आहे. त्यामुळे सध्या तटस्थ असणाऱ्या 8 आमदारांची मतं निर्णायक ठरणार आहेत. तटस्थ लहान पक्ष आणि आमदार 1) बहुजन विकास आघाडी - 3 2) शेकाप - 1 3) एमआयएम - 2 4) माकप - 1 5) मनसे - 1 तटस्थ आमदार संख्या एकूण - 8