मुंबई, 22 ऑगस्ट: मागील दोन दिवस राज्यात अनेक ठिकाणी रिपरिप पाऊस (Light Rainfall) झाल्यानंतर आता राज्यात पुन्हा पावसानं दडी मारली (Monsoon Break in Maharashtra) आहे. पुढील पाच दिवस राज्यात पावसाची उघडीप राहील, असा अंदाज हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आला आहे. पण आज महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर काही ठिकाणी आणि उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळणार आहेत. तर मध्य प्रदेश आणि गुजरातमधील काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. आजपासून पुढील पाच दिवस राज्यात पावसाची शक्यता फार कमी आहे. राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात चांगली सुरुवात केल्यानंतर पुन्हा पावसानं उघडीप घेतली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी अस्मानी संकटात सापडला आहे. राज्यात पाऊस सातत्यानं ब्रेक घेत असल्यानं शेतकरी समुदायात चिंतेचं वातावरण पसरलं आहे. तसेच सततच्या ढगाळ हवामानामुळे शेतात उगवलेल्या थोड्याफार पिकांवर देखील रोगाचा प्रादुर्भाव पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हेही वाचा- कोरोना लशीमुळे पक्षाघाताचा धोका? संशोधनातून धक्कादायक माहिती उघड नंदुरबार, अमरावती, गोंदिया आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांत यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तर अन्य ठिकाणी सरासरी एवढा पाऊस कोसळला आहे. तर अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, सातारा, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. पुढील आणखी पाच दिवस राज्यात पावसाची उघडीप राहणार आहे. हेही वाचा- महाराष्ट्रात तिसरी लाट येणार का? विषाणूचा धोका कितपत? तज्ज्ञांचा मोठा खुलासा आज मुंबईसह ठाणे, पालघर, नाशिक या चार जिल्ह्यांसह कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील चोवीस तासांत याठिकाणी वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित जिल्ह्यातील नागरिकांनी लांबचा प्रवास टाळण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.