हवामान खात्याकडून मुंबईसह पालघर ठाणे जिल्ह्यांमध्ये सोमवारी अतिवृष्टीची अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई, 06 जून : मुंबई, ठाण्यासह उपनगरांमध्ये पहाटेपासून वादळी-वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. तर मुंबई, मुलुंड, ठाण्यासह उपनगरांमध्ये पुढील दोन तास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दादर, माटुंगा, सायन, कुर्ला भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. तर गोरेगाव, मालाड, कांदिवली परिसरात विजेच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे.
भिवंडी परिसरात रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे शहरातील कल्याण रस्त्यावर पाणी साचले असून दुकानात पाणी घुसायला सुरुवात झाली आहे. नवीवस्ती येथील मोठ्या नाल्याची सफाई महानगरपालिकेने व्यवस्थित केली नसल्याने भिवंडी - कल्याण रोडवरील अप्सरा टॉकीज समोर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. परिणामी वाहन चालकांना याचा मोठा फटका बसत असल्याचं पाहायला मिळत आहे. संपादन- क्रांती कानेटकर