नवी दिल्ली, 23 मे : देशातील किरकोळ महागाईचा सध्या 8 वर्षांच्या उच्चांकावर आहे. घाऊक महागाई 17 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. महागाईच्या प्रश्नाबाबत एका उच्च सरकारी अधिकाऱ्याने News18 ला दिलेल्या माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीपासून म्हणजेच ऑक्टोबरपासून महागाईत घट होऊ शकते. सध्याच्या परिस्थितीसाठी अनेक आंतरराष्ट्रीय घटक कारणीभूत ठरत असल्याचं त्यांनी सांगितलं. दुसऱ्या सहामाहीमध्ये किमतीत घसरणीची शक्यता - उच्च सरकारी अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं, की आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत किमती कमी होण्याची शक्यता आहे. जागतिक पुरवठा साखळीतील व्यत्यय, चीनमधील लॉकडाउन आणि रशिया-युक्रेन युद्ध हे महागाईचे जागतिक स्त्रोत आहेत. आपण महागाई कमी करू शकतो परंतु ती दूर करू शकत नाही. यावर कोणतंही सोपं उत्तर नाही. महागाई कमी करण्याच्या प्रत्येक पद्धतीची स्वत:ची एक किंमत असते. असं तेव्हा होतं ज्यावेळी तुम्ही बाहेरुन येणाऱ्या वस्तूचा पुरवठा नियंत्रित करू शकत नाही. आम्ही याचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. महागाई कमी करू शकतो, ती दूर करू शकत नाही. आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात किमती कमी होण्याची शक्यता आहे. विकसित देशांकडून आर्थिक उपाययोजना केल्या जात आहेत. रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम कमी होऊ शकतो. चीनमध्ये लॉकडाउन आणि मंदी हादेखील एक फॅक्टर आहे. भारतात सर्वसामान्यांना सणासुदीचा काळ सुरू झाल्यानंतर ऑक्टोबरनंतर काहीसा दिलासा मिळू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.
शनिवारी केंद्राने पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्कात प्रति लीटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपयांची कपात केली. त्यामुळे ग्राहकांसाठी पेट्रोलचा दर 9.5 आणि डिझेलचा दर 7 रुपयांचा कमी झाला. पीएम उज्ज्वला योजनेंतर्गत नऊ कोटी लाभर्थ्यांना कव्हर करण्यासाठी प्रति गॅस सिलेंडर 200 रुपये सब्सिडीची घोषणा करण्यात आली. यामुळे सरकारला अनुक्रमे 1 लाख कोटी रुपये आणि 6100 कोटी रुपये खर्च करावे लागतील. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही घोषणा केली.