मुंबई, 23 नोव्हेंबर : राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. नुकतच त्यांनी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. यावरून मोठा वाद निर्माण झाला. विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक झाले. राज्यभरात आंदोलन करण्यात आलं. दरम्यान आता यावर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रतिक्रिया देताना पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना खोचक टोला लगावला आहे. नेमकं काय म्हटलं चव्हाण यांनी? पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे जाणून-बुजून वारंवार वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. त्यांना कोपरापासून नमस्कार केलेला बरा. खरतर त्यांना राजकारणात पुन्हा सक्रिय व्हायचं आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना जाऊ देत नाहीत. त्यांना हिमाचल प्रदेशला पुन्हा जायचं आहे. त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हायचं आहे. त्यामुळे ते अशी वक्तव्य करत असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं. हेही वाचा : भावना गवळींचे राऊतांविरोधात गंभीर आरोप, महिला आयोगाकडे तक्रार करणार! राज्यपालांच्या वक्तव्यामुळे वाद राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आणि नव्या वादाला तोंड फुटलं. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली. राज्यपालांच्या या वक्तव्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. आता शिंदे गटाचा स्वाभिमान कुठे गेला असा सवाल राऊत यांनी केला होता. तसेच त्यांनी या प्रकरणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली होती.