मुंबई, 8 नोव्हेंबर : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. सत्तार यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात आंदोलन केली. तसंच अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली. अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्याबाबत भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नाराजी व्यक्त केली. तसंच एकनाथ शिंदेंनी सत्तार यांना माफी मागण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर अब्दुल सत्तार यांनी जाहीर माफी मागितली. तरीही राष्ट्रवादी काँग्रेस अजूनही अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यावर ठाम आहे. या सगळ्या वादावर काल दिवसभर शांत असलेल्या सुप्रिया सुळे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे यांनी या सगळ्या वादावर काही ट्वीट केली आहेत. काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? ‘महाराष्ट्राच्या एका मंत्र्याकडून काही अपशब्द वापरले गेले,याची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात उमटली. कारण अशा प्रकारची वक्तव्ये ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असं बोलणं-वागणं ही आपली परंपरा नाही. अशा प्रकारची वक्तव्ये सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्या लोकांकडून अपेक्षित नसतात,’ असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. ‘परंतु सगळेच तारतम्य पाळतात असे नाही. जरी त्यांनी काही तारतम्य पाळले नाही तरी ज्या पद्धतीने विविध संस्था, व्यक्ती, माध्यमातून याबाबत प्रतिक्रिया आल्या, संवेदना व्यक्त केल्या गेल्या ही बाब आश्वासक आहे. तिची नोंद घेणे गरजेचे आहे. मला आवर्जून असे सांगायचे आहे की, जर कुणी चुकीचे बोलले असेल, त्यांनी महिलांचा सन्मान जपला नसेल म्हणून आपण अस्वस्थ होणं स्वाभाविक असलं तरी आपण या सगळ्या प्रवृत्ती बाजूला टाकूयात आणि महाराष्ट्राची जी सुसंस्कृत परंपरा आहे, ती जतन करुया,’ असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं.
‘राज्यातील विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी, जाणकारांनी समंजसपणाची भूमिका दाखवून महाराष्ट्र हा ‘सुसंस्कृतच महाराष्ट्र’ आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित केले याबद्दल मी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते,’ असं सुप्रिया सुळे त्यांच्या ट्वीटमध्ये म्हणाल्या.