एकमेकांच्या पायात पाय अडकवून भारतीय जनता पक्षाला मोकळे रान द्यायचे, असे आघाडीतील काही लोकांनी परस्पर ठरवून टाकले आहे?
मुंबई, 14 जानेवारी : ‘नाशिक पदवीधर मतदारसंघात ‘तांबे’ मंडळींची तयारी आधीपासूनच सुरू होती व गेल्या महिन्यात एका जाहीर कार्यक्रमात फडणवीस यांनी तसे संकेतही दिले होते, पण काँग्रेस नेतृत्वास जाग आली नाही व एका आमदारकीसाठी तांबे यांनी प्रतिष्ठा घालवली. विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीतील गोंधळाचे चित्र समोर आले आहे. या गोंधळाला जबाबदार कोण? की एकमेकांच्या पायात पाय अडकवून भारतीय जनता पक्षाला मोकळे रान द्यायचे, असे आघाडीतील काही लोकांनी परस्पर ठरवून टाकले आहे? असा संतप्त सवाल शिवसेनेनं महाविकास आघाडीला केला आहे. ‘नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला नाट्यमय वळण मिळालं. सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरल्यामुळे काँग्रेसमध्ये एकच गोंधळ उडाला. या गोंधळावर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून सेनेनं महाविकास आघाडीवर नाराजी व्यक्त केली. विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीतील गोंधळाचे चित्र समोर आले आहे. या गोंधळास जबाबदार कोण? की एकमेकांच्या पायात पाय अडकवून भारतीय जनता पक्षाला मोकळे रान द्यायचे, असे आघाडीतील काही लोकांनी परस्पर ठरवून टाकले आहे? नाशिक पदवीधर, कोकण शिक्षक, अमरावती पदवीधर, नागपूर शिक्षक आणि संभाजीनगर शिक्षक अशा पाच मतदारसंघांत या निवडणुका होत आहेत. पाचपैकी तीन जागा महाविकास आघाडीकडे आणि दोन जागा भाजपकडे होत्या. महाविकास आघाडीने समन्वय आणि नियोजन या सूत्राने काम केले असते तर या वेळी तीन जागा कायम राखून एक जागा जास्त जिंकता आली असती, पण आता आहे ते सुद्धा गमावण्याची वेळ आली आहे, अशी नाराजी शिवसेनेनं व्यक्त केली. (‘मातोश्रीला गेली 25 वर्षे टक्केवारीचा अनुभव, त्यामुळे आदित्य..’ प्रवीण दरेकरांची गंभीर आरोप) ‘सत्यजीत तांबे हे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे. म्हणजे थोरात हे त्यांचे मामा. पुन्हा सत्यजीत तांबे हे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांमध्ये त्यांची गणना होते. मागच्या निवडणुकीत राहुल गांधी हे नगर येथे प्रचारासाठी आले असताना गांधी यांनी सत्यजीत तांबे यांच्याच निवासस्थानी मुक्काम केला होता. इतके जवळचे नाते. राहुल यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेतही सत्यजीत तांबे सामील झाले. अशा माणसाने फक्त एका आमदारकीसाठी भाजपच्या खेळीचे बळी व्हावे हे न पटणारे आहे, असं आश्चर्यही सेनेनं व्यक्त केलं. सत्यजीत तांबे व डॉ. सुधीर तांबे यांच्या निर्णयामुळे काँगेसची अवस्था खराब झाली. आता नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार नाही. नाशिकमध्ये जे घडले त्याचे श्रेय भाजप घेत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या चाणक्यगिरीमुळे नाशिकमध्ये हे घडले असे सांगितले जाते. हाती सत्ता व केंद्रीय तपास यंत्रणा असली की, असे चाणक्य पायलीस पन्नास निर्माण होतात. यात राजकीय खेळी कमी व सत्तेचा गैरवापर जास्त आहे. तरीही महाविकास आघाडीतील ढिलाई भाजपच्या पथ्यावर पडली, असेच म्हणावे लागेल. पाच जागी निवडणुका होत आहेत. त्याबाबत एकत्र बसून काही साधकबाधक चर्चा झाली काय? काही नियोजन, बांधणी ठरली काय? तर त्याचे उत्तर ‘नाही’ असेच द्यावे लागेल. अमरावतीमध्ये काँग्रेसकडे स्वतःचा उमेदवार नसताना त्या जागेसाठी हट्ट करून लढणे हा प्रकार नक्की काय म्हणावा? शेवटी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख लिंगाडे यांना काँग्रेस पक्षात घेऊन उमेदवारीची हळद लावावी लागली. मग ही जागा शिवसेनेस सोडली असती तर लिंगाडे हे तयारीनिशी लढले असते, असंही सेनेनं सुनावलं. ( ‘ज्यावेळी तुमचं घर फुटेल तेव्हा…’ बावनकुळेंच्या टीकेवर नाना पटोलेंचं उत्तर; बंडखोरांनाही इशारा ) ‘भाजपकडे स्वतःचे उमेदवार नाहीत. इकडचे तिकडचे लोक गोळा करून रिकाम्या जागा भरणे सुरू असते. तरीही भाजप तगडे आव्हान देत असल्याची हवा निर्माण केली जात आहे ती महाविकास आघाडीतील ढिलाईमुळे. विधान परिषदेच्या पाच मतदारसंघांच्या निवडणुका जशा गांभीर्याने घ्यायला हव्या तशा त्या घेतल्याचे दिसत नाही. अमरावतीमध्ये, नागपूरमध्ये तर ते स्पष्ट दिसते. भाजपला सुशिक्षित वर्गाचा अजिबात पाठिंबा नाही व सगळेच शिक्षित त्यांच्या भगतगणांत मोडत नाहीत हे दाखवायची आयतीच संधी मिळाली होती, पण फासे उलटे पडताना दिसत आहेत. तरीही मैदान सोडता येणार नाही, असंही सेनेनं महाविकास आघाडीला ठणकावलं.