JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / चौथीच्या पुस्तकात शिवरायांच्या इतिहासाचं राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाला वावडं!

चौथीच्या पुस्तकात शिवरायांच्या इतिहासाचं राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाला वावडं!

गेल्या 50 वर्षांपासून चौथीच्या इतिहासाचा अविभाज्य भाग असलेला शिवरायांचा इतिहास राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने अभ्यासक्रमातून वगळला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 ऑक्टोबर : छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्राथमिक शाळेच्या अभ्यासक्रमातून शिकवण्यात येतो. जवळपास अर्ध्या शतकाहून अधिक वर्षांपासून शिवरायांचे धडे चौथीच्या अभ्यासक्रमातून शिकवले जात आहेत. याआधी शिवाजी महाराजांच्या इतिहासाला केंद्रीय शिक्षण मंडळाकडून पुरेसं स्थान देत नसल्याबद्दल राज्यभरातून नाराजी व्यक्त केली जात होती. दरम्यान आता आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळानेही केंद्रीय शिक्षण मंडळाच्या पावलावर पाऊल टाकलं आहे. राज्यात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यात मतांच्या राजकारणासाठी शिवाजी महाराजांचे नाव प्रत्येक व्यासपीठावर घेतलं जात आहे. पण महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहासच वगळला आहे. राज्यातील सरकारी शाळांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थांना स्थानिक संस्कृतीसह आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण मिळावे यासाठी स्थानिक भाषेत शिक्षण देणाऱ्या शाळांना आंतरराष्ट्रीय असं बिरुद लावलं आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ स्थापन करण्यात आलं. स्थापनेनंतर वर्षभर पुस्तकांशिवाय या शाळा चालवण्यात आल्या. या शाळेची पहिली ते चौथीची पुस्तके ऑगस्टमध्ये छापली गेली. त्यानंतर चौथीच्या पुस्तकात शिवरायांचा इतिहासच वगळल्याचं समोर आलं आहे. चौथीच्या अभ्यासक्रमात असलेल्या इतिहासाच्या पुस्तकात 1991 मध्ये बदल करण्यात आला होता. तेव्हा मोठा वाद झाल्यानंतर शिवाजी महाराजांचा चौथीच्या पुस्तकातील इतिहास न बदलण्याचा ठराव विधिमंडळात झाला होता. त्यानंतर 2010 मध्ये अभ्यासक्रमाची पुनर्रचनाही झाली मात्र चौथीचं इतिहासाचं पुस्तक तसंच ठेवण्यात आलं. 1970 मध्ये इतिहासाचा अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला होता. त्यानंतर काही ठराविक बदल वगळले तर पुस्तक तसेच ठेवण्यात आलं आहे. पण आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळानं मात्र यात बदल केले आहेत. आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमातून शिवरायांचा इतिहास हद्दपार करणाऱ्या भाजप-शिवसेना सरकारला हद्दपार करण्याची हीच वेळ असल्याचं काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. तर खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनीही संताप व्यक्त केला असून शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचा घाट घातला असेल तर हे खपवून घेतलं जाणार नाही असं म्हटलं आहे. तसेच ज्यांनी कुणी ही आगळीक केली असेल त्यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे. VIDEO : ‘… म्हणून शरद पवारांना ईडीची नोटीस’, मुख्यमंत्री फडणवीस यांचा गौप्यस्फोट

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या