शिर्डी, 19 नोव्हेंबर : शिवसेनेसोबत सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू असताना काँग्रेसला धक्का बसला आहे. कारण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघातूनच काँग्रेसच्या भूमिकेला विरोध होत आहे. शिवसेनेसोबत जाण्यास मुस्लिम समाजाने विरोध दर्शवला आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना मुस्लीम समाजाकडून पत्रही पाठवण्यात आलं आहे. ‘शिवसेनेशी हातमिळवणी करू नका. जातीयवादी पक्षाशी आघाडी करू नका, अशी मागणी मुस्लीम समाजाने निवेदनाद्वारे केली आहे. ‘मुस्लीम समाज अनेक वर्षांपासून काँग्रेसचा मतदार आहे. मात्र शिवसेनेसोबत जाण्याच्या भूमिकेमुळे मुस्लीम समाज काँग्रेसपासून दूर जाईल. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडून मुस्लिम समाजाची फसवणूक करण्यात आली आहे,’ असा आरोप पत्राद्वारे करण्यात आला आहे. ‘पदाधिकाऱ्यांच्या स्वार्थी हेतूसाठी पक्षाचे नुकसान करून घेऊ नये,’ अशी विनंती संगमनेर येथील मुस्लीम समाजाने सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघातूनच काँग्रेसच्या भूमिकेला विरोध होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातील काँग्रेस नेते नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दिल्लीतील हालचालींवर थोरातांची माहिती ‘काँग्रेस आमदारांमध्ये अस्वस्थता वाढणार नाही. दिल्ली जे सांगेल ते ऐकले जाईल. दिल्लीने सांगितले तर दोन तीन दिवसांत बैठक होईल, चर्चा होईल. सोनिया गांधी यांच्यासोबतच्या बैठकीनंतर शरद पवार बोलले. त्यावर मला बोलायचे नाही, त्यांच्या बैठकीत नेमके काय ठरले तेच सांगू शकतात. वेगवेगळ्या विषयावर चर्चा करताना वेळ लागतो. हे आधीही घडले आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील चर्चा पूर्ण होण्यासही वेळ लागू शकतो,’ असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. VIDEO: सत्ता स्थापनेवरुन शरद पवारांच्या वक्तव्यामुळे मोठी खळबळ, पाहा काय म्हणाले