मुंबई, 15 नोव्हेंबर : मागच्या काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत जेलमधून बाहेर आले. शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी पुन्हा संजय राऊत तयार झाल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडी बनववण्यात मोलाचा वाटा असलेल्या राऊत यांनी पुन्हा महाविकास आघाडी सत्तेत येईल असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या जन्मदिनी ते आज माध्यमांशी बोलते होते. यावेळी त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेबाबतही भाष्य केले. राज्यातील अस्थीर राजकारणावर त्यांनी सरकारवर सडकून टीका केली.
राऊत म्हणाले की,अनेक नेत्यांची चूक नसताना त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत. कार्यालयांवर चुकीच्या पद्धतीने हातोडे पडत आहेत. याविरूद्ध जनतेच्या मनात उद्रेक आणि तीव्र नाराजी आहे आणि ती वेळोवेळी व्यक्तही होत आहे. पण आम्ही याविरूद्ध लढत राहू आणि हळूहळू सगळेच नेते बाहेर येतील. पुन्हा एकदा आकाश निरभ्र होईल. राज्यातील सध्याचे राजकीय वातावरण हे अस्थिर आहे. परंतू राज्यात कितीही सत्तांतरे झाली तरी, मी बाहेर असो अथवा यांनी मला पुन्हा जेलमध्ये टाकले तरी पुन्हा राज्यात मविआचे सरकार येईल असे ते म्हणाले.
हे ही वाचा : चलो गुवाहाटी.., मुख्यमंत्री शिंदेंचं ठरलं; 50 आमदारांना घेऊन जाण्याची तारीख निश्चित!
2024 पर्यंत मविआचा मुख्यमंत्री होईल याची आम्हाला पूर्णपणे खात्री असल्याचे मतही संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. तसेच जितेंद्र आव्हाड यांच्याविरूद्ध सुरू असलेले प्रकरण हे खोटे आहे. या प्रकारच्या विकृतीतून कोणाला काय आनंद मिळतो काय माहित. पण हे सगळं थांबायला हवं. सध्या राज्यात राजकीय अस्थिरता आहे.
सध्याच्या घटना पाहता, महाराष्ट्राने आपली राजकीय संस्कृती, परंपरा जपली पाहिजे. या परिस्थितीत आपली राजकीय परंपरा जपत, पुन्हा एकदा पारदर्शकपणे काम केले पाहिजे. अशी मी आजच्या माझ्या वाढदिवसादिवशी ईश्वराकडे प्रार्थना केल्याचे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले. संजय राऊतांना आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक राजकीय नेत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
हे ही वाचा : जितेंद्र आव्हाडांच्या जामीन अर्जावर कोर्टात हायहोल्टेज ड्रामा, दुपारी 2 वाजता होणार फैसला
ठाण्यात शिंदे गटातील कार्यकर्त्यांकडून ठाकरे गटीतील शिवसैनिकांवर अन्याय आणि हल्ले होत आहे. यावर बोलताना ते म्हणाले, तुम्ही जर सत्ता, पैशाची ताकद दाखवून शिवसैनिकांचे रक्त सांडत असाल तर शिवसेनेच्या शिवसैनिकांचे रक्त इतकेही स्वस्त नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे. आजपर्यंत ज्यांनी शिवसेनेचे रक्त सांडण्याचा प्रयत्न केला ते नेस्तनाबूत झाल्याचेही ते म्हणाले.