राणा दाम्पत्याचा गनिमी कावा? शिवसैनिकांना चकवा देत गाठली मुंबई?
अमरावती, 22 एप्रिल : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री (Matoshree) समोर उद्या (23 एप्रिल) हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठण करण्याचं जाहीर केलं. त्यानंतर आपण रेल्वेने कार्यकर्त्यांसोबत मुंबईत जाणार असल्याचं म्हटलं. राणा दाम्पत्याने घेतलेल्या या भूमिकेनंतर शिवसैनिकांनीही आक्रमक पवित्रा घेत त्यांना रोखण्याची रणनिती आखली. मात्र, शिवसैनिकांची (Shivsainik) ही रणनिती लक्षात घेता राणा दाम्पत्याने गनिमी कावा पद्धतीचा वापर केल्याचं दिसून येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास खाजगी वाहनाने नागपूर विमानतळावर पोहोचले. त्यानंतर सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास नागपूर विमानतळावरुन मुंबईला रवाना झाले. खासदार नवनीत राणा यांना पुरवण्यात आलेली वाय प्लस सुरक्षा न घेता त्या मुंबईत दाखल झाल्या असल्याची माहिती समोर येत आहे. वाचा : राणा दाम्पत्याला अमरावतीत रोखण्याची शिवसेनेने आखली रणनीती राणा दाम्पत्य हे आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईत दाखल होणार आणि त्यासाठी रेल्वेची तिकीटे सुद्धा बूक करण्यात आली होती अशी माहिती समोर आली होती. त्यानुसार, शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याला अमरावती रेल्वे स्थानकातच रोखण्यासाठी रणनिती आखली होती. राणा दाम्पत्य आज सायंकाळी 7 वाजता बडनेरा रेल्वे स्टेशनवरून आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईत निघणार होते. या दम्पत्याला रेल्वे स्थानकातच रोखण्यासाठी शिवसैनिकांनी तयारी सुरू केली आहे. सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट व्हायरल करून आज सायंकाळी बडनेरा रेल्वे स्थानकावर उपस्थित राहा असं आवाहन करण्यात आले. पण राणा दाम्पत्याने शिवसैनिकांना चकवा देत मुंबई गाठली असल्याचं वृत्त समोर येत आहे. ‘चांगलाच पाहुणचार घेऊ’, शिवसेना आमदाराचा रवी राणांना थेट इशारा अमरावती जिल्ह्यातील बडनेराचे आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्याबाहेर हनुमान चालीस म्हणण्याचा चंग बांधला आहे. पण, रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी तिथे जाऊनच दाखवावे, त्यांचा चांगलाच पाहूणचार घेतल्याशिवाय सोडणार नाही, असा इशाराच शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे. बुलडाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आपल्या विधानांमुळे कायम चर्चेत असतात. आता त्यांनी थेट आमदार रवी राणा यांना उघडपणे धमकीच दिली आहे. ‘अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा कुटुंब हे नौटंकी करत असून प्रसिद्धीसाठी नाटक करीत आहेत. राणा कुटुंब निवडून आले राष्ट्रवादीच्या भरवश्यावर आता चमचेगिरी करत आहे भाजपची. असे भारतीय जनता पार्टीने या राज्यात असे बरेच भूकणारे कुत्रे सोडलेले आहेत, जसे राज ठाकरे, नारायण राणे, किरीट सॊमय्या व आता हे राणा कुटुंब हे सर्व ते आहेत, अशी विखारी टीका संजय गायकवाड यांनी केली.