मुंबई, 6 सप्टेंबर : आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिल्यानंतर कोकणातील चाकरमानी पुन्हा मुंबई, ठाणे, पुण्याकडे परतीच्या प्रवासाला निघालेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत, तर खड्ड्यांमध्ये हा प्रवास अधिक त्रासदायक ठरत आहे. महामार्गावर अनेक ठिकाणी एक लेन असल्याने वाहतुकीची कोंडी होताना दिसत आहे. प्रवासी गणेशभक्त व चाकरमान्यांना वाहतुकीचा फटका बसत असल्याने ते त्रस्त झाले आहे. ही परिस्थिती रस्ते वाहतुकीची आहे. मात्र रेल्वे प्रवाशांनाही अशाच अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोकणात जाणाऱ्या रेल्वे खचाखच भरून जात असल्याने प्रवाशांना रेल्वेत चढणंही कठीण जात आहे.
याच गर्दीमुळे माणगावात संतप्त प्रवाशांनी रेल्वे रोखल्याचंही समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार माणगाव परिसरातुन मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांनी वापी ट्रेनचे तिकीट आरक्षित केले होते. ही रेल्वे संध्याकाळी 4 वाजता माणगाव स्थानकामध्ये आली. मात्र, आतील प्रवाशांनी रेल्वेची दारे बंद केल्याने माणगाव स्थानकामध्ये प्रतिक्षा करणाऱ्या प्रवाशांना या रेल्वेत चढता आले नाही. आतल्या प्रवाशांनी दार न उघडल्याने रेल्वे निघून गेली; माणगावात नंतर प्रवाशांनी काय केलं पाहा… परिणामी रेल्वे निघून गेली. गणेश विसर्जनानंतर मोठ्या संख्येने चाकरमानी पुन्हा मुंबईच्या दिशेने प्रवास करतात. आज रेल्वेमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली. त्यात रेल्वेचं दार बंद केल्याने माणगाव स्थानकात प्रवाशांनी गोंधळ घातला.