मला मुख्यंमत्र्यांना पण विचारावे लागेल. पक्षातील माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा करावी लागेल. चर्चेअंतीच कुठलाही निर्णय घेतला जाईल
मुंबई, 16 ऑक्टोबर : अंधेरी पोटनिवडणुकीला आता नवे वळण मिळाले आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्रानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माघार घेण्याचे संकेत दिले आहे. ‘यापूर्वी अनेकदा योग्य पद्धतीने मागणी झाल्यावर असे निर्णय घेतले आहे, सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल’ असं फडणवीस म्हणाले. राज ठाकरे यांच्या पत्रानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘आमच्या उमेदवाराला समर्थन मिळावे म्हणून आशिष शेलार राज ठाकरे यांना भेटायला गेले होते. त्यावेळेस त्यांनी इच्छा आणि मत वक्त केली आणि आता तसे पत्र ही दिले आहे. यापूर्वी अनेकदा योग्य पद्धतीने मागणी झाल्यावर असे निर्णय घेतले आहे. आर आर पाटील असो किंवा काही दिवसांपूर्वीच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुका असो. पण आता आम्ही उमेदवार दिला आहे. त्यामुळे आता या पत्रावर विचार ही करायचा झाला तर मला तो एकटा करता येणार नाही. माझ्या पक्षात मी काही एकटा निर्णय घेत नाही’ असं फडणवीस म्हणाले. ‘बाळासाहेबांची शिवसेना पण आमच्या सोबत आहे. त्यामुळे मला मुख्यंमत्र्यांना पण विचारावे लागेल. पक्षातील माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा करावी लागेल. चर्चेअंतीच कुठलाही निर्णय घेतला जाईल’ असं फडणवीस म्हणाले. राज ठाकरे यांच्या पत्रानंतर शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी त्यांच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. जर तुम्ही बाळासाहेबांच्या विचाराचं नाव घेत असेल तर भाजपच्या उमेदवाराने भरलेला अर्ज मागे घ्यावा. भाजपसाठी जी लाचारी पत्कारली आहे, ती नाकारावी आणि पोटनिवडणुकीमध्ये बिनविरोध करण्याचा पायंडा पाळावा, असं आवाहन राऊत यांनी केलं. (‘मुख्यमंत्री राज ठाकरे..’; एकनाथ शिंदेंसोबतच्या भेटीनंतर मनसेच्या नेत्याचं ते ट्विट चर्चेत) तर, ;एखाद्या नेत्याचं निधन झालं तर पोटनिवडणूक ही बिनविरोध होत असते. विरोधी पक्ष सुद्धा आपला उमेदवार कधी उभा करत नाही. पण, या ठिकाणी आपलं दुर्दैव आहे की विरोधकांनी आपला उमेदवार उभा केला आहे. निवडणूक लढवावी असं त्यांच्या उमेदवाराला वाटत आहे. माझी इच्छा आहे, मला असं वाटलं होतं की, ही निवडणूक बिनविरोधच होईल, अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी दिली. (Andheri East Bypoll : अंधेरीच्या लढाईत ठाकरेंची नवी खेळी, ऋतुजा लटकेंचंही टेन्शन वाढलं!) अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुक बिनविरोध करण्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांनी आवाहन केलं आहे. ऋतुजा लटके यांच्या आवाहनाला आता विरोधी पक्ष विशेषता भाजप कसा प्रतिसाद देतोय हे आता पहावं लागेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पडद्यामागून मोठी राजकीय घडामोड सुरू असल्याची माहिती मिळत आहे. राज ठाकरे आपल्या पत्रात काय म्हणाले? ‘रमेश लटके हे चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा-प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीचं आमदार होण्यानं कै. रमेश यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल.
माझी विनंती आहे की, भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पाहावं, अशी विनंती राज ठाकरे यांनी फडणवीस यांना केली.
मी आमच्या पक्षातर्फे परिस्थितीत दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात तेव्हा शक्यतो निवडणूक न लढवण्याचं धोरण स्वीकारतो. तसं करण्याने आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रद्धांजलीच अर्पण करतो अशी माझी भावना आहे. आपणही तसं करावं असं मला माझं मन सांगतं. असं करणं हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे. मला आशा आहे, आपण माझ्या विनंतीचा स्वीकार कराल, अशी अपेक्षाही राज ठाकरे यांनी व्यक्त केली.