मुंबई, 22 जुलै : राज्यात मागच्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने अनेक नद्यांमधील पाणी पातळी कमी झाली आहे. परंतु राज्यात वातावरण ढगाळ असल्याने पावसाची शक्यता आहे. दरम्यान आज (ता. २२) पूर्व विदर्भ, पूर्व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यतः उघडीप राहून, हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच मुंबई, पुण्यातही पावसाची उघडीप असणार आहे परंतु हवामान ढगाळ असल्याने हलक्या सरी बरसू शकतात. (Maharashtra Rain Update)
पश्चिम किनारपट्टीवर असलेला कमी दाबाचा पट्टा निवळल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली आहे. काल दिवसभर (ता. 21) ढगाळ हवामान, ऊन-सावल्यांचा लपंडाव सुरू होता. आज (ता. 22) पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, पूर्व मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात पावसाची उघडीप मिळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हे ही वाचा : Shiv Sena Sandeepan Bhumre : बंडखोर आमदार संदिपान भुमरेंच शहर तब्बल 8 दिवस अंधारात, शिवसेना आक्रमक
तसेच राजस्थानच्या गंगानगरपासून ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत हा पट्टा सक्रिय आहे. झारखंड आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. कर्नाटकपासून कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. हलक्या ते मध्यम पावसाची हजेरी राज्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली, तरी कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत.
दरम्यान मागच्या 24 तासांमध्ये नाशिक जिल्ह्यातील इगतपूरी येथे सर्वाधिक 90 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर गोंदियातील अर्जुनी मोरगाव येथे 70 मिलिमीटर पाऊस पडल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले.
हे ही वाचा : ‘माझं काय चुकलं?’; आदित्य ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यात बंडखोर आमदार सांगणार शिवसेनेचे हे चुकलेले निर्णय
विदर्भ : अर्जुनी मोरगाव 70, साकोली विभाग 50, लाखणी 40, सिरोंचा, सडक अर्जुनी गुरु प्रत्येकी 30, पश्चिम घाटमाथ्यावर डुंगरवाडी 60, लोणावळा, शिरगाव, दावडी, खोपोली येथे 50, कोयना नवजा, ताम्हिणी, खंद 40 मिमी पावसाची नोंद झाली.
पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. याचबरोबर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भातही अनेक नद्यांना पूर आला आहे. यामुळे बऱ्याच ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे.