मुंबई, 15 डिसेंबर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ठाकरे कुटुंबाच्या नावे रायगड जिल्ह्यातल्या कोर्लेईत असलेल्या कथित बंगल्याचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत किरीट सोमय्या या प्रकरणी याचा पाठपुरावा करत होते. पण आता या प्रकरणात ग्रामविकास खात्याची एंट्री झालीय. ग्रामविकास खात्यानं कोर्लेईतल्या बंगल्यांची चौकशी सुरु केलीय. दोन दिवस या प्रकरणाचा चौकशी अहवालही मागवलाय. आणि मुख्य म्हणजे अवघ्या चार दिवसांवर विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आहे, त्यामुळे अधिवेशनात सत्ताधारी या बंगल्यांचा मुद्दा उपस्थित करुन विधिमंडळ अधिवेशन गाजवण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंच्या परिवाराचे रायगडमध्ये 19 बंगले असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केलाय. या प्रकरणी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी 48 तासात या प्रकरणी चौकशी अहवाल पूर्ण करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती सोमय्यांनी दिली आहे.
काय आहेत आरोप? मुरुडच्या कोलई गावातील 19 बंगले ठाकरे कुटुंबाकडून अन्वय नाईकांकडून खरेदी केले. या बंगल्यांचा 2014 ते 2019 पर्यंतचा प्रॉपर्टी टॅक्सही भरला. 2021 मध्ये सर्व रेकॉर्ड्स गायब केल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.