कोल्हापूर, 12 ऑक्टोंबर : पश्चिम महाराष्ट्रात मुबलक पाणी आणि येथील जमीन कसदार असल्याने या भागातील शेतकरी शेतीतून भरघोस पिकांचे उत्पादन घेतो. यामुळे शेतकऱ्यांकडे चार पैसे शिल्लक राहतात परंतु मागच्या काही वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यात मानवी आणि अस्मानी संकटामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. यामुळे या भागातील शेतकऱ्यांवर मोठे आर्थीक संकट ओढावले आहे. दरम्यान मराठवाडा, विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांंच्या घटना ऐकून सुन्न व्हायचो पण आता कोल्हापूरसारख्या सदन जिल्ह्यातही शेती परवडत नसल्याने आत्महत्या होत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील वेंगरुळ येथील ओंकार मेघन पंडित (वय 26) या शेतकरी युवकाने कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी दुपारी ही घटना घडली. मागच्या कित्येक वर्षांपासून शेतीच्या उत्पादनातून पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी आपला उदरनिर्वाह करत होता परंतु या भागातीलही शेतकऱ्याची शेती नुकसानीत जात असल्याचे दिसून येत आहे. अवघ्या 26 वर्षांच्या तरूणाने आत्महत्या केल्याने जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा : लातूर : तीन मुलींनंतर झाला मुलगा, पत्नीच्या दवाखान्यासाठी पैसे नसल्याने पतीचं भयानक पाऊल
मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार हा शेती करत होता. त्याचा ट्रॅक्टर ही होता. शेती व ट्रॅक्टरसाठी घेतलेले कर्ज तसेच हातउसने घेतललेले पैसे यामुळे तो आर्थिक अडचणीत आला होता. तो प्रचंड मानसिक तणावाखाली होता. सोमवारी तो ‘मळव’ नावाचे शेतातील मंदिरात जातो, असे घरी सांगून गेला होता.
मंदिराच्या आवारात असलेल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. दोन तास झाले तरी घरी परत न आल्याने शोधाशोध केली असता त्याचा मृतदेह मंदिराच्या खोलीत लटकताना आढळून आला.
हे ही वाचा : Kolhapur Wrestler Died : कोल्हापुरात अवघ्या 23 वर्षीय पैलवानाचा सरावादरम्यान मृत्यू, कुस्ती जगतात शोककळा
याची माहिती त्याचे चुलते विजय पंडित यांनी भुदरगड पोलिसात दिली आहे. त्याच्या मागे आई, वडील, पत्नी आणि एक वर्षाचा मुलगा असा परिवार आहे.