ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी कोल्हापूर, 2 नोव्हेंबर : कोल्हापुरात लव जिहादच्या विषयावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणातील शाळकरी मुलगी जर परत आली नाही तर तांडव करू, असा इशारा यावेळी नितेश राणे यांनी दिला. तसंच धर्मांतर बंदीचा कायदाही येत्या अधिवेशनात आणणार असल्याची माहिती नितेश राणेंनी दिली. कोल्हापुरात शाळकरी मुलीच्या बेपत्ता प्रकरणाला लव्ह जिहादचं वळण लागलं आहे. या प्रकरणावरून कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात आमदार नितेश राणे यांनीही सहभागी होत पोलिसांना खडे बोल सुनावले. राज्यात लव्ह जिहादची प्रकरणे खपवून घेणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. पोलिसांच्या तपासावर त्यांनी नाराजी व्यक्त करत पोलिसांवर कारवाईची मागणी केली. तसंच मुलीचा शोध घेऊन परत न आणल्यास तांडव करू असाही इशारा दिला. कोल्हापुरातली ही मुलगी 17 ऑक्टोबर पासून बेपत्ता आहे. ही मुलगी इयत्ता नववीमध्ये शिकत होती. दिवाळीपूर्वीचा पेपर द्यायला गेलेली मुलगी परतली नसल्यामुळे नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार केली. 17 दिवस उलटूनही मुलीचा अद्याप शोध लागला नाही. मुस्लिम युवकाने या मुलीला पळवल्याचा संशय आहे. दरम्यान मुस्लिम युवकही बेपत्ता असल्याने हा संशय बळावला आहे. लव्ह जिहादसाठीच मुलीला पळवल्याचा आरोप होत आहे. मुलीचा आणि युवकाचा शोध लागत नसल्यामुळे पोलिसांविरोधात रोष आहे. या प्रकरणाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून शहरात सुरू होती. त्यामुळे या प्रकरणाचा छडा लावावा अशी मागणी होत होती. मात्र पोलिसांडून तपासाला गती येत नसल्याने आक्रमक झालेल्या हिंदू संघटनांनी पोलीस ठाण्यावर आंदोलन केले. या सगळ्या प्रकरणानंतर आता राज्यात धर्मांतर बंदीच्या कायद्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे. त्या दृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचे आमदार नितेश राणे यांनी सांगितलं. 17 दिवस उलटूनही मुलीला शोधण्यास पोलिसांना आलेले अपयश या सगळ्याला कारणीभूत आहे, त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. पोलिसांनी आता मुलीला शोधून आणून नेमक्या वस्तुस्थितीची माहिती देण्याची गरज आहे, त्यामुळे आंदोलनानंतर तरी पोलिसना जाग येणार का? हे पाहणे महत्वाचे आहे.