गणेश गायकवाड, प्रतिनिधी अंबरनाथ, 5 एप्रिल : भारताच्या संरक्षण मोहिमेत अद्यायावत शस्त्रांची निर्मिती करणाऱ्या आयुध निर्माणी कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी व्हेंटिलेटरची यशस्वीरित्या निर्मिती केली आहे. हा व्हेंटिलेटर ‘कोरोना’ विषाणूमुळे उद्भविलेल्या परिस्थितीत रूग्णांना वरदान ठरणार आहे. अवघ्या आठ दिवसात कंपनीच्या कामगारांनी रुग्णाला श्वाास घेण्यास सोपे जाणारी ही यंत्रणा विकसीत केली आहे. अंबरनाथ मशीन टुल प्रोटोटाईप फॅक्टरीमध्ये तयार केलेला हा व्हेंटिलेटर मोटार आणि काही पॅरामेडिकल सुटे भाग वगळता हा संपूर्ण व्हेंटिलेटर कारखान्यात उपलब्ध असणाऱ्या साधनांतून बनवण्यात आला आहे. रुग्णाच्या गरजेनुसार दर मिनिटांला 12 ते 30 वेळा श्वाास घेता येऊ शकणारी व्यवस्था या व्हेंटिलेटरमध्ये आहे. थेट वीज आणि बॅटरी अशा दोन्ही पद्धतीने हे व्हेंटिलेटर काम करते. तीन तासांचा बॅटरी बॅकअप असल्याने रुग्णवाहिकेत रुग्णाला त्याचा उपयोग होऊ शकतो.
तसंच आयुध निर्माणी समुहातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या व्हेंटिलेटर चाचणी करून त्याला प्रमाणित केलं आहे. संचारबंदीच्या काळात कारखान्यातील कामगारांनी विशेष परवानगी घेऊन बनविलेल्या या व्हेंटिलेटरची किंमत अवघी २५ हजार रुपये आहे. शासनाने ऑर्डर दिल्यास युद्ध पातळीवर महिन्याभरात दोन हजार व्हेंटिलेटर तयार करण्याची क्षमता असल्याची माहिती कंपनी व्यवस्थापकांनी दिली. हेही वाचा -
कोरोना रुग्ण आढळल्यामुळे अभिनेत्री अंकिता लोखंडेचं अपार्टमेंट सील
1953 पासून अंबरनाथ येथील मशिन टुल प्रोटोटाईप फॅक्टरीमध्ये लष्कर आणि नौदलासाठी अत्याधुनिक शस्त्रांची निर्मिती होते. ‘कोरोना’ विषाणूच्या वाढत्या संसर्गाने सर्व जगाला वेठीस धरले आहे. भारतही त्याला अपवाद नाही. युद्धजन्य परिस्थितीत नेहमीच उत्तम कामगिरी करणाऱ्या आयुध निर्माणी समुहाने या साथीच्या आजारातही देशवासियांना मदत करण्याचा निर्णय घेतला. या कारखान्यता तयार झालेले हे छोटे व्हेंटिलेटर अशावेळी रुग्णाला पुरेसा श्वाास घेण्यास उपयोगी ठरू शकणार आहे.