मुंबई, 22 ऑगस्ट : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. सरपंच आणि नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून आणण्यासाठीचं विधेयक आज विधानसभेमध्ये मंजूर झालं. या विधेयकावर बोलताना धनजंय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांवर शाब्दिक हल्ला केला. या हल्ल्यावर पलटवार करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनंजय मुंडेंसाठी अडचणीच्या ठरलेल्या मुद्द्यावरच बोट ठेवलं. धनंजय मुंडे काय म्हणाले? एकनाथ शिंदे 40 घेऊन गेले, मुख्यमंत्री झाले. नगरसेवकही शिंदे गटात सहभागी झाले, पण आता नगरसेवक मोठ्या प्रमाणावर नाराज आहेत. कारण आता जे विधेयक आलं आहे, त्यामुळे नगराध्यक्ष थेट जनतेतून होणार आहे, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात एकनाथ राहावं, ऐकनाथ राहू नये, असा टोला धनंजय मुंडेंनी हाणला. मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर धनंजय मुंडे यांच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ताट, वाटी चलो गुवाहाटी, अशा घोषणा दिल्या जात होत्या, धनंजय मुंडेही तिकडे होते. धनंजय मुंडे बेंबीच्या देठापासून ओरडून बोलत होते, जसं ते कित्येक वर्षांपासूनचे शिवसैनिक आहेत. तुमचा सगळा प्रवास मला माहिती आहे. देवेंद्रजींनी प्रेम, दया, करुणा दाखवली, पण परत परत दाखवता येणार नाही, असा पलटवार एकनाथ शिंदे यांनी केला.
मुंडेंचा फडणवीसांनाही टोला देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणायची सवय आहे, त्यामुळे मला उपमुख्यमंत्री फार वेळा म्हणता येत नाही. मला दु:ख या गोष्टीचं आहे की देवेंद्र फडणवीस विरोधीपक्षनेते होते, ते संविधानिक पद होतं, मात्र आता उपमुख्यमंत्री झाले ते संविधानिक पद नाही. हे बोलत असतना धनंजय मुंडे यांनी अजितदादांची माफी मागितली. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्याचं मला दु:ख वाटत आहे, असंही मुंडे म्हणाले.