नितेश राणे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करताच “मी सभा सोडून जाऊ का?”
कणकवली, 02 फेब्रुवारी :: शिवसेना कार्यकर्ते संतोष परब (Shivsainik Santosh Parab) यांच्यावरील हल्ला प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांना चांगलेच भोवले आहे. सिंधुदुर्ग कोर्टाने (Sindhudurg court) नितेश राणे यांना 4 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे राणेंचा 4 तारखेपर्यंत मुक्काम हा पोलीस कोठडीत राहणार आहे. ४ तारखेनंतरच त्यांना जामिनीसाठी अर्ज करत येणार आहे. जामीन अर्जासाठी सत्र न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत धावाधाव करणारे भाजपचे आमदार नितेश राणे यांना अखेर न्याय व्यवस्थेपुढे शरण यावे लागले आहे. नितेश राणे यांना आधी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यामुळे नितेश राणे जामिनासाठी अर्ज करतील अशी शक्यता होती. पण, सरकारी वकिलांनी यावर आक्षेप घेत जोरदार युक्तीवाद केला. अखेरीस नितेश राणे यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वैद्यकीय चाचणी केल्यानंतर आजच नितेश राणे यांची कणकवली पोलीस स्टेशनला हलवलण्यात येणार आहे. दरम्यान, नितेश राणे यांनी आज सकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली दिवाणी न्यायालयात शरण अर्ज दाखल केला. त्यानंतर नितेश राणे यांच्या वकिलांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली. तर सरकारी वकिलांकडून नितेश राणेंच्या पोलीस कोठडीची मागणी केली. या मागणीसाठी पोलिसांना सबळ कारणं दिलं. त्यामुळे नितेश राणेंना पोलीस कोठडी सुनावली आहे. कणकवली दिवाणी न्यायालयात सुनावणी सुरु असल्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. दंगल नियंत्रण पथक न्यायालयाबाहेर दाखल झालं. तसेच न्यायालयाच्या गाड्या दाखल झाल्या. सिंधुदुर्ग सेशन्स कोर्टाने कालच नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी मुंबई हायकोर्टात अर्ज दाखल केला होता. पण हायकोर्टानेही त्यांना दिवाणी न्यायालयात जाण्यास सांगितले. त्यानंतर नितेश राणे यांना पुन्हा सिंधुदुर्गात परतावे लागले. सुरुवातील न्यायालयाने त्यांना दिलासा देत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. पण, सरकारी वकिलांनी जोरदार आक्षेप घेतला आणि कडाडून विरोध केला. अखेर सरकारी वकिलांचा युक्तीवाद आणि पोलिसांनी दिलेले सबळ पुरावे यामुळे नितेश राणेंना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.