पालघर, 11 एप्रिल: मातीचा ढिगाऱ्याखाली दबून दोन जणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. घरासाठी माती काढताना शुक्रवारी ही दुर्दैवी घटना घडली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, जव्हार तालुक्यातील बोरहट्टी गावातील आदिवासी शेतकरी घरांसाठी माती काढण्यासाठी गेले होते. अचानक मातीची दरड कोसळली. ढिगाऱ्याखाली दबून दोघांचा जागीच मृत्यू झाला तर इतर सहा जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. हेही वाचा… मुंबईतल्या या हॉटस्पॉटमध्ये कोरोना रोखणं खरं आव्हान, हे PHOTO बघून येईल अंदाज पावसाळा जवळ आल्यामुळे घरांच्या कुडांना लेप करण्यासाठी बोरहट्टी गावातील काही आदिवासी बांधव गावाशेजारील डोंगरावर माती घेण्यासाठी गेले होते. यात सात महिलांचा समावेश होता. सर्वजण रस्त्यालगत असलेल्या डोंगरातील माती खोदकाम करीत होते. यात खोदकाम करताना अचानक वरतून मातीचा धस (ढिगारा) कोसळला. खोदकाम करीत असलेल्या या कामगारांच्या अंगावर येऊन पडला. हेही वाचा… धारावीत COVID-19 चा चौथा मृत्यूच; मुंबईच्या कोरोना हॉटस्पॉटमधली चिंता वाढली या डोंगराच्या एकदम जवळ असलेले मनोज यशवंत जाधव (30-वर्ष) व मुक्ता सुदाम तराळ (16- वर्ष ) हे दोघे ढिगाऱ्याखाली दबले गेले. मोठे दगड डोक्यावर पडल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. तसेच यात दोन व्यक्तींना गंभीर दुखापत झाली तर चार जणांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर जव्हार येथील कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गंभीर दुखापत झालेल्या दोन महिलांना उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रामदास मराड यांनी सांगितले. संपादन- संदीप पारोळेकर