4 कोटींच्या खंडणीसाठी एका सेवा निवृत्त अधिकाऱ्याचे अपहरण करण्यात आल्याची घटना समोर आली
औरंगाबाद, 18 सप्टेंबर : औरंगाबाद शहरात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. 4 कोटींच्या खंडणीसाठी एका सेवा निवृत्त अधिकाऱ्याचे अपहरण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी सतर्कता दाखवल्यामुळे वेळीच या अधिकाऱ्याची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील इब्राहिमपूर तालुक्यात ही घटना घडली. शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास उद्योग मंत्रालयातील सेवा निवृत्त अधिकारी विश्वनाथ लक्ष्मण राजळे (60) यांचं अपहरण करण्यात आलं होतं. राजळे यांनी छत्रपती संभाजीराजे साखर कारखान्याच्या पूर्वे बाजूला इब्राहिमपूर शिवारामध्ये जमीन घेतली आहे. (पुण्यात लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या तरुणाची आत्महत्या, घरमालकाने दिली धक्कादायक माहिती) शनिवारी दुपारी ते सालदार दीपक भागवतसोबत काम आटोपून आपल्या फार्म हाऊसवर आले होते. त्याचवेळी अज्ञात आरोपींनी राजळे यांना मारहाण केली आणि चाकूचा धाक दाखवून कारमध्ये बसवून पळवून नेलं. त्यानंतर आरोपींनी राजळे यांचा मुलगा सागर राजळे यांना फोन करून ४ कोटींची खंडणी मागितली. सागर राजळे यांनी तातडीने याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी लगेच पाऊल उचलत यंत्रणेला कामाला लावलं. अपहरणकर्त्यांचे मोबाईल लोकेशन शोधून काढण्यात आले. (जळगावात मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरी, 5 दिवसात तब्बल इतक्या दुचाकी जप्त) त्यानुसार अपहरणकर्ते दावलवाडी शिवारातील पेट्रोल पंपावर असल्याचे उघड झाले. औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपींना पेट्रोल पंपावर बेड्या ठोकल्या आणि विश्वनाथ राजळे यांची सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी 6 आरोपींना ताब्यात घेतले Eus. विकास भगवान खरात (22), पांडुरंग पडूळ, रोहित दीपक भागवत (18), बबनराव वाघ (44), राहुल बबन गुंजकर(29), दीपक भागवत (44) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी करमाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करत आहे.