अकोला, 14 सप्टेंबर : जलकुंभाची (water tank) गत दहा वर्षांपासून साफसफाई न केल्याने दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. पावसाळ्यात पाण्याबरोबर येणारा गाळ, माती ही टाकीत साचून राहते. यामुळे पाणी दूषित होते. या दूषित पाणीपुरवठ्याने प्रशासन नागरिकांच्या जिवाशी खेळ करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अकोला तालुक्यातील खारपाणपट्ट्यात असलेल्या गावांत जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र, ज्या टाकीमधून पाणी पुरवठा केला जातो, त्या टाकीची गेल्या 10 वर्षांपासून साफसफाईच केली नसल्याने ग्रामस्थांची तहान दूषित पाण्यावर असल्याचे चित्र आहे. पायऱ्या खराब अकोला शहरापासून जवळच असलेल्या घुसर येथे पाणीपुरवठा करणारी टाकी आहे. त्या टाकीची गेल्या अनेक वर्षापासून साफसफाई केलेली नाही. टाकीच्या पायऱ्या खराब झाल्याने टाकीवर चढता येत नाही. त्यामुळे घुसर, घुसरवाडी, म्हातोडी, लाखोंडा बु, लाखोंडा खुर्द, कासली बु, कासली खुर्द, आगर या गावातील नागरिक दूषित पाणी पित आहेत. तसेच आपातापा येथील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा या मुख्य टाकीवरून 14 गावांना केला जातो. हेही वाचा- पारंपारिक शेतीला फाटा देत अख्खं गाव करतयं केळीची शेती, पाहा VIDEO जलकुंभाचे काम थातूरमातूर 2014 साली जलकुंभाचे काम थातूरमातूर केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. आपातापा (बारुला) विभागातील ग्रामस्थांचे दूषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे आता तरी प्रशासन लक्ष देईल का, आणि टाकीच्या पायऱ्या बसतील काय, असा प्रश्न या ठिकाणी गावकऱ्यांकडून उपस्थित होत आहे. लवकरच कामांना सुरुवात… टाकीच्या पायऱ्या खराब झाल्याने टाकीवर चढणे अशक्य आहे. लवकरच येथील कामांना सुरुवात होणार आहे. त्यासाठी 70 कोटींचा निधीही मंजूर करण्यात आलेला आहे. गावकऱ्यांना शुद्ध पाणी मिळेल असे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील कार्यकारी अभियंता अनिल चव्हाण यांनी सांगितले.