आई कुठे काय करते
मुंबई, 22 डिसेंबर : आई कुठे काय करते ही मालिका महाराष्ट्राच्या घराघरात लोकप्रिय आहे. मालिकेत प्रत्येक व्यक्तिरेखेच्या आयुष्यात काही ना काही प्रसंग घडत आहेतच. मालिका आईची असली, तरी आईभोवतीची पात्रंही तितकीच महत्त्वाची दाखवली जातात. प्रत्येक संकटात सगळं देशमुख कुटुंब एकत्र उभं राहतं. त्यामुळेच प्रेक्षकांना ही मालिका आपलीशी वाटते. आता या मालिकेने प्रसिद्ध संगीतकार सलील कुलकर्णींना सुद्धा भुरळ घातली आहे. सलील कुलकर्णींनी मालिकेतील एका सीनचा व्हिडीओ पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत. आई कुठे काय करते मालिका सध्या रंजक वळणावर आहे. मालिकेत अभिषेकची पत्नी अनघाने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. देशमुख कुटुंबात कन्येचे आगमन झाल्यामुळे सगळेच आनंदी आहेत. परंतु, अभिषेकने विश्वातघात केल्यामुळे अनघावर मोठा डोंगर कोसळला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात अरुंधतीने आपल्या सुनेसाठी अंगाई गायली आहे. ही अंगाई सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘एकदा काय झाले’ या चित्रपटातील आहे. त्यामुळे अरुंधती ही अंगाई गातानाचा एक व्हिडीओ सलील कुलकर्णी यांनी शेअर केला आहे. हेही वाचा - Apurva Nemlekar : अपूर्वाने अखेर पूर्ण केला आईला दिलेला तो शब्द; समोर येताच रडतच म्हणाली… अरुंधतीने ‘बाळाला झोप का गं येत नाही’ ही अंगाई गायली आहे. ही अंगाई सलील कुलकर्णी यांनी लिहिलेली आहे. सलील कुलकर्णी यांनी मालिकेतील अरुंधतीचा अंगाई व्हिडीओ शेअर करत त्यांनी अरुंधती म्हणजेच मधुराणी गोखलेचं कौतुक केलं आहे. त्यांनी लिहिलंय कि, ‘बाळाला झोप का गं येत नाही… ‘एकदा काय झालं’मधली माझी अतिशय आवडती अंगाई…!! आज ‘आई कुठे काय करते’मध्ये मधुराणी प्रभुलकर म्हणजेच मालिकेतल्या अरुंधतीला ती एका हळव्या प्रसंगी गाताना पाहून अनेक फोन आले…मेसेज आले…’
ते पुढे म्हणाले कि, ‘या क्षणाच्या सर्वात लोकप्रिय मालिकेत ‘एकदा काय झालं’मधलं हे गाणं घेणं ही पण गाण्याला आणि चित्रपटाला मिळालेली एक दादच आहे. मधुराणी..तू नेहमीच मन लावून गातेस’ असं म्हणत त्यांनी स्टार प्रवाह व आई कुठे काय करते टीमचे आभार मानले आहेत.
सलील कुलकर्णी यांनी केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे. संगीतकार डॉ.सलील कुलकर्णी यांच्या गाण्याचा, संगीताचा प्रचंड चाहता वर्ग आहे. सलील यांनी ‘आयुष्यावर बोलू काही’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. त्याचसोबत त्यांनी दर्जेदार चित्रपट निर्माण केले आहेत. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या सलील कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘एकदा काय झालं’ या चित्रपटाचं प्रचंड कौतुक झालं होतं. प्रेक्षकांना हा चित्रपट चांगलाच भावला होता. आता यानंतर सलील कुलकर्णी प्रेक्षकांसाठी काय घेऊन येणार याची उत्सुकता आहे.