'आई कुठे काय करते'
मुंबई, 27 ऑक्टोबर : ‘आई कुठे काय करते’ मालिका दिवसेंदिवस अधिकाधिक रंजक होत चालली आहे. मालिकेचा प्रेक्षकवर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. गेले अडीच-तीन वर्ष सुरू असलेल्या या मालिकेची लोकप्रियता आजही कायम आहे. मालिकेत प्रत्येक व्यक्तिरेखेच्या आयुष्यात काही ना काही प्रसंग घडत आहेतच. मालिका आईची असली, तरी आईभोवतीची पात्रंही तितकीच महत्त्वाची दाखवली जातात. आता पुन्हा अरुंधतीसमोर एक आव्हान उभं राहणार अरुंधती नाही तर तिला खंबीरपणे साथ देणारा तिचा मुलगा यशच्या आयुष्यात आता संकट येणार आहे. गौरी आणि यश एकमेकांपासून कायमचे दूर होणार असल्याचं चिन्ह दिसत आहे. ‘आई कुठे काय करते’ मालिकेत आता नवा ट्विस्ट येणार आहे. प्रेक्षकांना ज्याची भीती होती तेच होणार आहे. आधी दाखवण्यात येणाऱ्या कथानकावरून गौरी यशला सोडून निघून जाणार का असा अंदाज प्रेक्षकांकडून लावण्यात येत होता. मात्र आता तो अंदाज खरा ठरतोय. गौरी आणि यश यांचं नातं आता तुटण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलं आहे. मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. त्यात देशमुख कुटुंबीय आनंदात दिवाळी साजरी करत आहे. गौरीसुद्धा अमेरिकेहून परत आली आहे. ती तिकडे गेली होती तेव्हा तिने यशला दुर्लक्षच केलं होतं. आता आल्यावर तीने यशला तिचा मोठा निर्णय सांगितलं आहे. हेही वाचा - मराठी मालिकाविश्वात बालकलाकारांचीच हवा; ‘हे’ बालकलाकार आहेत सोशल मीडिया स्टार गौरीला तिच्या कामासाठी परदेशात मोठी ऑफर आली आहे. त्यामुळे तिने परदेशी कामासाठी जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र इथे यश तिच्या वाटेकडे डोळे लावून बसला होता. आता ही बातमी समजताच त्यालाही मोठा धक्का बसला आहे. त्याला गौरीविषयी जी शंका होती तेच घडणार आहे. दुसरीकडे अनिरुद्ध पुन्हा एकदा यशला गौरीविरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. अनिरुद्ध आणि संजना सुद्धा घटस्फोट घेणार आहेत. त्यालाच धरून अनिरुद्ध यशला गौरीविरुद्ध बोलत आहे. पण आता यश कोणता निर्णय घेणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.
मालिकेत कायम आईच्या बाजूने उभा राहणारा यश आता अरुंधती आणि आशुतोषला एकत्र आणण्यासाठी सतत प्रयत्न करतोय. आशुतोष सोबत नवीन नातं जोडण्यासाठी तो अरुंधतीला पाठींबा देतोय. पण हे करत असताना आता त्याच्याच गौरीसोबतच्या नात्याची घडी विस्कटणार कि तो समजूतदारपणे हे सांभाळणार ते बघणं महत्वाचं ठरणार आहे. गौरी यशला कायमची सोडून जाणार का आणि अरुंधती हे सगळं कसं सांभाळणार हे मालिकेच्या आगामी भागांमध्ये समजेल.
‘आई कुठे काय करते’ करते मालिकेचा टीआरपी घसरून मालिकेचा क्रमांक घसरला होता. पण मालिकेतील रंजक वळणांमुळे ‘आई कुठे काय करते’ ने बाजी मारली असून या आठ्वड्यात मालिकेने टीआरपी रेटिंगमध्ये पुन्हा पहिला क्रमांक पटकावला आहे.