प्रशांत बाग, प्रतिनिधी मुंबई, 9 सप्टेंबर : कर चोरांविरुद्ध आयकर खात्याने जोरदार मोहीम सुरू केली आहे. यामुळे वाळू माफिया आणि साखर सम्राटांना मोठा दणका बसला आहे. महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यात तब्बल 20 जागी आयकर विभागाने छापे टाकले. यात 25 ऑगस्ट रोजी सर्च ऑपरेशनच्या माध्यमातून केलेल्या कारवाईतून आयकर विभागाच्या हाती मोठं घबाड लागलं आहे. आयकर विभागाची मोठी कारवाई - आयकर विभागाने केलेल्या कारवाईत तब्बल 50 कोटींपेक्षा जास्त बेहिशेबी उत्पन्न आणि100 कोटींपेक्षा जास्त बेनामी व्यवहार उघड झाला आहे. तसेच आयकर विभागाने 5 कोटींचा मुद्देमालही जप्त केला. सोलापूर, उस्मानाबाद, कोल्हापूर आणि नाशिक या जिल्ह्यात आयकर विभागाने सर्च ऑपरेशन केलं होतं. यावेळी आयकर विभागाने हार्ड डिस्क, कागदपत्रे जप्त केली आहेत. उत्पादन, रस्ते, बांधकाम, आरोग्यसेवा, वैद्यकीय महाविद्यालय यासह वाळू उत्खनन, साखर उत्पादन यात गुंतवणूक असलेल्या 2 बड्या समूहांना दणका बसला आहे. यावेळी झालेल्या कारवाईत करचोरीच्या अनेक पद्धती उघड झाल्या आहेत. तसेच करोडोंची बेहिशोबी रोख रक्कम जप्त करण्यात आली. हेही वाचा - जालन्यामध्ये रिअल लाईफ ‘ishqiya’, सिलिंडरला केला बॉम्ब आणि नवऱ्याला उडवलं वैद्यकीय क्षेत्रातील आर्थिक अनागोंदीवरही आयकर खात्याची कुऱ्हाड टाकली. कर चोरांविरुद्ध आयकर खात्याने जोरदार मोहीम सुरू केली आहे. तर येत्या दिवसात, ही कारवाई अधिक आक्रमक पद्धतीने होणार आहे. यात अनेक बडे डॉक्टर्स, व्यावसायिक आयकर खात्याच्या रडारवर असल्याची माहिती मिळाली आहे.