नवी दिल्ली 17 मे : नेपाळमध्ये कोरोनाचा प्रसार (Coronavirus in Nepal) वाढताना दिसत आहे. त्यामुळे, परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. तिथे हजारोच्या संख्येनं नवीन रुग्ण (Corona Patients) रोज समोर येत आहेत. तर, दररोज शेकडो रुग्णांचा मृत्यू होत आहे. याचदरम्यान नेपाळमध्ये कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजनचाही मोठा तुटवडा (Lack of Oxygen) जाणवू लागला आहे. अशात पंतप्रधान के पी शर्मा ओली यांची नजर सध्या भारताकडे आहे. त्यांची अशी इच्छा आहे, की या कठीण काळात भारतानं (India) त्यांची मदत करावी. ओली यांची मैत्री तर चीनसोबत आहे, मात्र मदतीची अपेक्षा ते भारताकडून करत आहेत. के पी शर्मा ओली यांचे विदेश सल्लागार रंजन भट्टाराय यांनी टाइम्स ऑफ इंडियासोबत बातचीत करताना सांगितलं, की नेपाळला भारताकडून मदतीची अपेक्षा आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ओलींची अशी इच्छा आहे, की भारतानं त्यांना या कठीण काळात ऑक्सिजन, आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटरचा पुरवठा करावा. शुक्रवारीच के पी शर्मा ओली यांनी तिसऱ्यांदा नेपाळच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. ओली यांचे चीनसोबत चांगले संबंध आहेत. सध्या चीन नेपाळला कोरोनाविरोधातील लढ्यासाठी औषधं आणि लसींचा पुरवठा करत आहे. मात्र, भट्टाराय यांच्या म्हणण्यानुसार, कोरोनापासून बचावासाठी लागणारं सर्वात मोठं शस्त्र म्हणजेच लिक्विट ऑक्सिजन त्यांच्याकडे नाही. नेपाळमध्ये ऑक्सिजनच्या तुटवड्यानं तेथील नागरिकांची चिंता वाढली आहे. ऑक्सिजनची मागणी दहा पटीनं वाढली असून आम्ही भारत सरकारसोबत बातचीत करत असल्याचं त्यांनी सांगितलं. नेपाळमध्ये कोरोनास्थिती दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. इथे दररोज आठ हजाराहून अधिक नवे रुग्ण समोर येत आहेत. तर दररोज 150-200 रुग्णांचा मृत्यू होत आहे. नुकतंच चीननं नेपाळला कोरोना लसीचे 8 लाख डोस मदत म्हणून दिले आहेत. नेपाळला सिरम इन्सिट्यूटट ऑफ इंडियाच्या कोविशील्ड लसीचेही 10 लाख डोस मिळाले आहेत. मात्र, सिरमसोबत नेपाळची 20 लाख डोसची डील झाली होती. नेपाळला अशी आशा आहे, की त्यांनी लवकरच भारतातून लसीचे आणखी डोस मिळतील.